लुटारूंना संधी देऊ नका, मोदींनाच पुन्हा पंतप्रधान करा !
लुटारूंना संधी देऊ नका, मोदींनाच पुन्हा पंतप्रधान करा !
मुंबई, दि. २ जून ;
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व वैश्विक ठरले आहे. विकासकामाच्या बाबतीत त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. त्यामुळे विरोधकांकडून फेक नरेटीव्ह तयार केले जात आहे. त्यामध्ये, काही राजकीय पक्ष, त्यांची इको सिस्टीम काम करते आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनी या प्रवृत्तीच्या विरोधातील लढाई तीव्र करावी असे आवाहन करत लुटारूंना पुन्हा संधी द्यायची नसेल तर नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मुंबई भाजपाच्या वतीने आयोजित सोशल मीडिया इन्फ्लुएंसर संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. वानखेडे स्टेडियमवरील गरवारे क्लब हाऊसमध्ये कार्यक्रम पार पडला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अॅड. आशिष शेलार, पर्यटन मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते आ. प्रवीण दरेकर, चित्राताई वाघ, श्वेता शालिनी, निधी कामदार, प्रकाश गाडे, नवनाथ बन आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सोशल मीडियावर रोज एक लढाई सुरू असते. सोशल मीडियातील वॉरियर योग्य विवेचन करून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. देशात नकारात्मक वातावरण तयार केले जात आहे. त्यासाठी हजारो गोबेल्स विरोधी पक्षाच्या माध्यमातून काम करत आहेत. विरोधक नीती, अनितीचा विचार करत नाहीत. राहुल गांधी परदेशात जाऊन देशाच्या विरोधात बोलतात. संपूर्ण जग भारतातील लोकशाहीचे कौतुक करत असताना राहुल गांधी मात्र लोकशाही संपुष्टात आली असे सांगतात. ते निराशेत आपल्या देशाची निंदा करताना दिसतात. एकेकाळी पंतप्रधान नरसिंहराव यांनी सुद्धा स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांना संयुक्त राष्ट्र संघात भारताची बाजू मांडण्यासाठी सांगितले होते. विरोधकांकडून जाणूनबुजून भयानक वातावरण तयार केले जात आहे. काँग्रेसने २०१८ मध्ये केंब्रिज ॲनलिटिकाला त्याचे काम दिले होते. विरोधक सगळे हातखंडे वापरत आहेत. आता ही लढाई शांत डोक्याने लढावी लागणार आहे असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सोशल मीडियावर काम करणाऱ्या अनेकांवर अन्याय झाला. त्यांना विनाकारण जेलमध्ये टाकण्यात आले. त्यामुळे ही लढाई ताकदीने लढावी लागणार आहे. येणारे वर्ष देशांकरता महत्त्वाचे आहे. मोदीजींसारखा पंतप्रधान पुन्हा झाल्यास अर्थव्यवस्था दहा ट्रिलियन पर्यंत पोहोचेल. पंतप्रधान मोदींनी गरीब कल्याणाचे मॉडेल यशस्वी केले आहे. अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी वितरण व्यवस्था बदलली आहे. एक रुपया देखील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतो. जागतिक पातळीवर ग्लोबल लीडरशिप म्हणून त्यांचा नावलौकिक होतो आहे. येणाऱ्या काळात भारत जगातील उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
