सहानुभूतीवर स्वार होण्याचा उद्धव ठाकरेंचा केविलवाणा प्रयत्न.
सहानुभूतीवर स्वार होण्याचा उद्धव ठाकरेंचा केविलवाणा प्रयत्न.
कणकवली, दि. २ मे :
महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले होते. यावर भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अशा प्रकारची वक्तव्ये आणि चित्र उभे करून उद्धव ठाकरे यांचा सहानुभूतीवर स्वार होण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याची घणाघाती टीका आ. दरेकर यांनी केली.
यावेळी बोलताना आ. दरेकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची वज्रमुठ सभा झाली. खरं म्हणजे ही वज्रमूठ दाखवायला आहे. परंतु कुठल्याही प्रकारचा एकोपा, एकसंघपणा या महाविकास आघाडीत दिसून येत नाही. कालच्या सभेला राष्ट्रवादीचे अजित पवार उपस्थित होते. पण पूर्ण सहभाग असा राष्ट्रवादीचा दिसून आला नाही. त्यामुळे भाजपा आणि शिंदेंचे जे आव्हान आहे ते परतवण्यासाठी दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न या सभांच्या माध्यमातून होत असल्याची टिकाही दरेकर यांनी केली.
सभेत नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी आगपाखड केली. टोमणे, मत्सर तर होतेच. परंतु काही गोष्टींचा उद्धव ठाकरे यांनी भाषणात जो उल्लेख केला तो करत असताना वस्तुस्थितीही लक्षात घेणे गरजेचे आहे. नेहमीप्रमाणे मुंबईचा लचका तोडायचाय, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे म्हटले. काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारे भावनिक वातावरण, सहानुभूती निर्माण करून मतं मिळविण्याचा दुर्दैवी प्रयत्न होतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे जाहीर इशारा दिला होता की, कुणाच्या बापाची हिंमत नाही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची. आम्ही सर्वजण कोण आहोत? त्यामुळेच केवळ मुंबईचा ठेका उद्धव ठाकरेंनी घेतलेला नाही. आम्हीही या मातीतले, भूमीतले आहोत. त्यामुळे अशा प्रकारचे चित्र उभे करून सहानुभूतीवर स्वार होण्याचा केविलवाणा दुर्दैवी प्रयत्न उद्धव ठाकरे करताना दिसत असल्याचा टोलाही दरेकर यांनी लगावला.
मुंबई बदलतेय, मुंबईचे स्वरूप बदलत आहे. स्वच्छ, सुंदर मुंबई होतेय. मुंबईच्या ठेवी आमच्या बापाच्या नाहीत तर त्या तुमच्याही बापाच्या नाहीत. त्या ठेवी मुंबईकरांच्या आहेत. त्या मुंबईकरांच्या कामी येणार नाहीत मग कुणाच्या कामी येणार? ते काय प्रॉफिट बॅकिंग इन्स्टिट्युशन आहे का? असा सवालही दरेकर यांनी केला. तसेच उद्धव ठाकरे यांनी अदानी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यचाही दरेकर यांनी खरपूस समाचार घेतला. माझी उद्धव ठाकरेंना विचारणा आहे की आपला कुठलाही उद्योग व्यवसाय नसताना एकाच्या दोन मातोश्री कशा होतात. याबाबत मार्मिकमध्ये लेखमालिका चालवली तर बरे होईल. सामनात संजय राऊत यांना सांगून रोखठोकमध्ये लिहिलेत तर निदान झेंडा नाचवीणारा शिवसैनिक श्रीमंत होईल.
