आमचे हिंदुत्व शेंडी जाणव्याचे नाही, यांचे हिंदुत्व गोमुत्रधारी !
आमचे हिंदुत्व शेंडी जाणव्याचे नाही, यांचे हिंदुत्व गोमुत्रधारी !
नागपूर, दि. १७ एप्रिल ;
देशात लोकशाही आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे.सत्तेवर बसलेल्या लोकांच्या मित्रांच्या फायद्यासाठी लोकशाहीचा वापर केला जात आहे. यांच्या मित्रांचे नंबर श्रीमंतीत वर जात आहे तर जनतेचा नंबर मात्र खाली खाली जात आहे. लोकशाहीच्या मार्गाने देश चालण्यासाठी ज्या माणसाने संविधान दिले त्याचे रक्षण आम्ही करु शकत नाही का? घटना बचाव नाही तर घटनेचे रक्षण मीच करणार अशी म्हणण्याची वेळ आली आहे अशी तोफ माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डागली.
महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा नागपूरमध्ये पार पडली. यावेळी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते.
राज्यातील शिंदे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांवर संकटा मागून संकटे येत आहेत. राज्यातील सरकार हे अवकाळी सरकार आहे. आमचे सरकार असताना शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली आता मात्र पंचनामे करत बसले आहेत.
मी काँग्रेसबरोबर गेलो म्हणजे हिंदुत्व सोडले असा आरोप करता, काँग्रेसवाले हिंदू नाहीत का? आमचे हिंदुत्व शेंडी जाणव्याचे नाही. यांचे हिंदुत्व गोमुत्रधारी आहे. सरसंघटालक मोहन भागवत मशिदीत जाऊन आले, मी मशिदीत जाऊन आले असतो तर किती गोंधळ घातला असता. मशिदीत जाऊन हे कव्वाली गाणार. देशात व राज्यात आज जो कारभार सुरु आहे तो रा. स्व. संघाला मान्य आहे का?
ही लढाई तुमच्यासाठी सुरु आहे, यात तुमचा सहभाग महत्वाचा आहे, तुमची साथ असेल तर आता जिंकेपर्यंत थांबायचे नाही. धार्मिक मुद्दे पुढे करुन जनतेचे मुद्दे टाळले जात आहेत. लोकशाही मेली नाही मरु देणार नाही असा निर्धार करा व आगामी निवडणुकीत भाजपाला घरी बसवा.
