परिक्षेसाठी मोदी सरकारची हटवादी भूमिका.
मुंबई, दि. २७ ऑगस्टः
कोरोनाचे संकट अजून संपलेले नाही, देशभरातून रुग्ण संख्याही दररोज वाढतच असताना मोदी सरकार मात्र JEE आणि NEET या परिक्षा ठरल्या वेळेतच घ्यायच्या हट्टाला पेटले आहे. अनेक राजकीय पक्ष आणि तज्ज्ञांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी केलेली आहे. मात्र विद्यार्थी आणि पालकांकडून दबाव असल्यानेच परिक्षा ठरल्या वेळेतच होतील, असे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले आहे.
परिक्षा घेतल्याच तर लाखो विद्यार्थी, पालक, शिक्षक व इतर स्टाफ यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यातील एखादा विद्यार्थी अथवा परिक्षेसंबंधी काम करणाऱ्यामध्ये कोरोनाचे लक्षण आढळले तर किती महागात पडेल, याचा जराही विचार सरकार वा परीक्षा घेतल्याच पाहिजेत असा अट्टाहास करणारे लोक का करत नाहीत. लाखोंच्या जीवाशी खेळून कशाला परीक्षा घेता, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
बॉलिवूड अभिनेता जीशान अय्यूब यानेही सरकारच्या या आडमुठ्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माणसे मेली तर चालतील का? असा सवाल त्याने ट्विटवरुन विचारला आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जेईई परीक्षा देणाऱ्या ८० टक्के उमेदवारांनी अॅडमिट कार्ड डाउनलोड केले असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांच्यावर पालकांचा दबाव असल्याचे ते म्हणतात. जेईई परीक्षेसाठी साडे आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न या मंत्री महोदयांनी विचारात घेतलेला दिसत नाही. थातूर मातूर यंत्रणा उभारुन परीक्षा घेण्याचा अट्टाहास एखाद्या विद्यार्थाच्या जीवावर बेतला तर त्याची जबाबदारी हे मंत्री घेतील का, असा सवाल पालक विचारत आहेत.