देश, लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसच जनतेच्या आशेचा किरण !
देश, लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसच जनतेच्या आशेचा किरण !
मुंबई, दि. १५ फेब्रुवारी;
भाजपाचा कारभार पाहता देशात लोकशाही, संविधान राहिल का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पण भारत जोडो यात्रेने जनतेच्या आशा काँग्रेसकडून वाढल्या आहेत. देश, लोकशाही व संविधान वाचवण्याचे काम काँग्रेसच करु शकतो. काँग्रेस पक्षच आता आशेचा किरण आहे हा विश्वास वाढला आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत बाळासाहेब थोरात बोलत होते, ते पुढे म्हणाले की, भारत जोडो यात्रेची दखल जगाने घेतलेली आहे, एवढी मोठी पदयात्रा जगाच्या पाठीवार आजपर्यंत झालेली नाही. ही यात्रा महाराष्ट्रात यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने काम केले व त्याचे कौतुक देशभर झाले. भारत जोडो यात्रेने जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचे काम केले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले की, राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे, विधान परिषदेच्या निवडणुकीतील वातावरण पाहता राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला भिती वाटू लागली आहे म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळल्या जात आहेत. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकाही एकत्रितच घेतल्या जाण्याची शक्यता आहे. आगामी वर्ष हे महत्वाचे आहे. अमरावती व नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेचा विजय झाला असून ही विजयाची पहिली पायरी आहे. आता आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या कामाला आतापासूनच लागा असे चव्हाण म्हणाले.
