सुप्रीम कोर्टातील अपात्रतेचा निकाल लवकर लागावा !
सुप्रीम कोर्टातील अपात्रतेचा निकाल लवकर लागावा !
मुंबई, दि. ८ फेब्रुवारी:
सर्वोच्च न्यायालयात अपात्रतेचा निकाल लवकर लागावा ही अपेक्षा असून लोकशाहीच्या दृष्टीने अपात्रतेचा मुद्दा, या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल अशी अपेक्षा आहे.अपात्रतेचा मुद्दा अगोदर निकाली निघायला हवा असे आमचे मत आहे. आमचा लोकशाही व न्यायालयावर संपूर्ण विश्वास असे शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, १६ आमदार अपात्र ठरण्याची दाट शक्यता आहे. निवडणुक आयोगाने काय करावे, असे आम्हाला सांगायचे नाही. ही माहिती जनतेच्या मनातला संभ्रम दूर व्हावा या हेतूने दिलेली आहे. संख्या, प्रतिज्ञापत्र आम्ही दिलेले आहे. एकतर्फी निकाल द्यायचा असता तर निवडणुक आयोगाने अगोदरच निकाल दिला असता. आम्ही न्यायालयाला विनंती केली होती परंतु न्यायालयाने निवडणुक आयोग स्वतंत्र संस्था असल्याचे सांगत निवडणुक आयोगाने निकाल दिल्यास त्याला आव्हान देता येईल. आम्ही सगळी प्रक्रिया निवडणुक आयोगाला कळवूनच आजवर शिवसेनेतील निवडणुका घेतल्या. आम्ही केलेल्या सर्व प्रक्रिया निवडणुक आयोगाला सादर केलेले आहेत.
गेली सहा महिने शिवसेनेचे काय होणार? गद्दारांचे काय होणार? अशी चर्चा सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी १४ फेब्रुवारीपासून नियमित होणार आहे. निवडणुक आयोगाची सुनावणी पूर्ण झाली आहे. शिवसेना एकच आहे, दुसरी मी मानत नाही. आम्ही आमचे मुद्दे मांडलेले आहेत. राजकीय पक्ष केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर अवलंबून असू शकत नाही. विधीमंडळ पक्ष म्हणजे संपूर्ण पक्ष नव्हे. असे असेल तर कोणीही लोकप्रतिनिधी विकत घेईल व पैशांचा जोरावर कुणीही पंतप्रधान, मुख्यमंत्री होईल.
पक्षांतर्गत लोकशाही प्रमाणेच शिवसेना निवडणुका घेतो. शिवसेनाप्रमुख पद तसेच ठेऊन पक्षप्रमुख पद स्वीकारले आहे. शिवसेनेत मुख्य नेता असे पद नाही. आम्ही सगळ्या कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्या आहेत.
