कृषी अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी विज्ञानाला चालना.
कृषी अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी विज्ञानाला चालना…
नागपूर, दि. 3 जानेवारी : –
विज्ञानाला प्रोत्साहन देतांना त्यात कृषी तंत्रज्ञानाचा समावेश आहे. शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारणे हा त्यामागील उद्देश आहे. कृषी अर्थव्यवस्था बळकट करणे हा प्रयत्न आहे. देशाच्या विकासात वैज्ञानिक प्रगतीचे महत्त्व असाधारण आहे. देशाने औषधनिर्मिती आणि हवामान शास्त्र यात प्रगती साधली असून त्याबाबत जगात लौकीक मिळविला आहे. त्यातून देशाची अर्थव्यवस्थाही मजबूत झाली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलन, जाती भेद निर्मूलन क्षेत्रात कार्य केले. ग्रामविकासाचे कार्य करतांना विवेकवादी विचारांचा प्रचार केला. त्यांच्या नावाच्या विद्यापीठात ही काँग्रेस होणे हे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे आज सावित्रीबाई फुले यांचीही जयंती आहे. ह्या काँग्रेसचे उद्दिष्ट महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञान असे आहे. भारतीय महिला वैज्ञानिकांनी विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपली छाप सोडली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दुरदर्शी नेतृत्वात विज्ञान तंत्रज्ञानात देशाने प्रगती केली आहे. त्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. येथे बाल विज्ञान काँग्रेसचेही आयोजन केले आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला चालना मिळेल. महाराष्ट्रातील मनुष्यबळ हे सर्वोत्कृष्ट मनुष्यबळ आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, विज्ञानाचे दोन उद्दिष्ट असावेत, आत्मनिर्भर भारत आणि अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण. देशाचे सकल घरेलू उत्पादनात सेवा क्षेत्राचे योगदान ५२ ते ५४ टक्के आहे. उत्पादन क्षेत्राचे योगदान २२ ते २४ टक्के, कृषी क्षेत्राचे योगदान१२ ते १४ टक्के. देशाची ६५ टक्के लोकसंख्या ही खेड्यात राहते. त्या लोकांच्या शाश्वत विकासासाठी विज्ञानाने कार्य करावे. जल-जंगल- जमीन या संसाधनांच्या विकासावर आधारीत विज्ञान संशोधन असावे. मिळालेल्या ज्ञानाचे रुपांतर संपत्तीत करा. कोणतीही वस्तू आणि कोणतीही व्यक्ती ही निरुपयोगी नसते.निर्यातीत वाढ केल्यासच आपण आर्थिक महासत्ता बनू शकतो. त्यात विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे मोलाचे योगदान असू शकते. देशात अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर्सची बनविण्याचे प्रधानमंत्र्यांचे स्वप्न साकारण्याचा आधार विज्ञानाची प्रगती असू शकेल.
