कर्नाटकच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रविरोधी गरळ ओकणं बंद करावं..
कर्नाटकच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रविरोधी गरळ ओकणं बंद करावं..
मुंबई, दि. २८ डिसेंबर :-
कर्नाटकचे मंत्री, आमदार सातत्यानं महाराष्ट्रविरोधी गरळ ओकण्याचं काम सुरु आहे. “मुंबईमध्ये वीस टक्के कन्नड भााषिक राहतात. मुंबई कर्नाटकची आहे. मुंबई केंद्रशासित करा,” अशा प्रकारची वादग्रस्त करुन कर्नाटकच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रवासियांच्या संतप्त भावना आणि तीव्र नाराजी कर्नाटक सरकारला कळवाव्यात. केंद्रीय गृहमंत्र्यांनाही कर्नाटकला समज देण्यास भाग पाडावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे विधानसभेत विषय उपस्थित करुन कर्नाटकचे मंत्री आणि आमदारांच्या महाराष्ट्रविरोधी वक्तव्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबईमध्ये कन्नडभाषिकंच नव्हे तर विविध प्रांतातून आलेले नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे. कर्नाटक सरकार सीमाप्रश्नाला विनाकारण वेगळं रुप देण्याचा प्रयत्न करत आहे. “मुंबईमध्ये वीस टक्के कन्नड भााषिक राहतात. मुंबई कर्नाटकची आहे. मुंबई केंद्रशासित करा,” अशी प्रकारची त्यांची वक्तव्ये सहन करता येणार नाहीत. मी त्यांच्या वक्तव्यांचा निषेध करतो.
महाराष्ट्र सरकारनेही कर्नाटक सरकारला तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांना महाराष्ट्राच्या तीव्र भावना कळवाव्यात. केंद्रीय गृहमंत्र्यांनीही कर्नाटक सरकारला समज देण्याबाबत कळवण्यात यावे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.
