सरकारला ‘भारत जोडो यात्रा’ रोखावी वाटत असेल तर जरुर रोखावी !
सरकारला ‘भारत जोडो यात्रा’ रोखावी वाटत असेल तर जरुर रोखावी !
अकोला, दि. १७ नोव्हेंबर :
भारत जोडो यात्रा हा एक विचार आहे, प्रवास आहे. शेतकरी, कष्टकरी, तरुण, दुकानदार सर्वांच्या समस्या, वेदना, व्यथा लोक या पदयात्रेत मांडत आहेत. ही पदयात्रा देश जोडण्याच्या उदात्त हेतूने निघाली आहे. पदयात्रेतून प्रेमाचा संदेश दिला जात आहे, द्वेष पसरवला जात नाही, असे असतानाही जर सरकारला ही पदयात्रा रोखावी असे वाटत असेल तर त्यांनी खुशाल रोखावी, असे खा. राहुल गांधी यांनी परखडपणे सांगितले.
भारत जोडो यात्रेदरम्यानची राहुल गांधी यांची ही सहावी पत्रकार परिषद चानी फाटा वाडेगाव, जिल्हा अकोला येथे पार पडली. यावेळी ते पुढे म्हणाले की, देशात एक द्वेष पसरवणाऱ्यांची विचारधारा आहे तर दुसरी विचारधारा देश जोडणाऱ्यांची आहे. द्वेष पसरवून देश भक्कम कसा होतो ? त्यामुळे तर देश कमजोर होतो. विविधतेत एकता ही या देशाची ओळख आहे, ही ओळख कायम ठेवण्यासाठी, देश जोडण्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ही पदयात्रा जाणार आहे. महाराष्ट्रात या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला व यातून मला खूप काही शिकायला मिळाले. महात्मा गांधी यांनी देशातून वर्धा येथेच राहण्याचा विचार का केला असावा? याचे उत्तर मला या विदर्भाच्या भूमित आल्यानंतर कळले. खरी काँग्रेस विदर्भात, महाराष्ट्रात आहे. काँग्रेसच्या विचारांची ही भूमी आहे.
