वारकरी संप्रदायाने शेतकऱ्यांमध्ये आत्मबल वाढवण्याचे प्रयत्न करावे.
वारकरी संप्रदायाने शेतकऱ्यांमध्ये आत्मबल वाढवण्याचे प्रयत्न करावे.
उस्मानाबाद, दि.12 :-
शरीरामधील असणाऱ्या सर्व अवगुणांवर वार करणारा आणि अजेय राहणारा पंथ म्हणजे वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायाने शेतकऱ्यांमध्ये आत्मबल वाढवण्याचे प्रयत्न करावे तसेच खचून न जाता ईश्वराने विधिलिखित केलेल्या गोष्टींचा स्विकार करण्याचे प्रबोधन करावे, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी आज येथे केले.
उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सि.) येथे वारकरी साहित्य परिषदेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात 11 गावांना पुरस्कार आणि टाळ, मृदंग व वीणा या भजनी साहित्याचे वितरण सोहळ्यानिमित्त पालकमंत्री डॉ. सावंत बोलत होते.
या पंथामध्ये नित्य नियमांना फार महत्व आहे. माणसाचे कर्म चांगले असले तर त्याचा जीवनकालही चांगला असतो. परंतु काहीवेळा चांगल्या माणसांच्या जीवनातही अडचणी निर्माण होतात. अशावेळी घाबरुन न जाता धैर्याने त्याचा सामना केल्याने अडचणींवर मात करणे शक्य असते. याचेच उदाहरण म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. या पंथाने आपल्या दिंडी आणि भजनाच्या माध्यमातून लोकांमध्ये आध्यात्मिकतेबरोबरच स्वच्छता आणि इतर जनजागृतीवर कामे प्रामुख्याने केली आहेत. त्यांच्या या स्तुत्य कामगिरीमुळे अनेक लोकांच्या जीवनात धर्म आणि समाजाबद्दल संसारातून साधना करण्याची इच्छा निर्माण होत आहे.
सत्कर्म करा, त्याचा चांगला मोबदला मिळेल. अडणीमुळे खचून जाऊ नका, आपण ही वारकरी साहित्य परिषद 11 वर्षापूर्वी सुरु झाली त्यामुळे आज 11 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व वारकरी बंधूंना शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून अनेक धार्मिक आणि सामाजिक हिताची कामे व्हावी अशी अपेक्षा करतो, असेही यावेळी डॉ.सावंत म्हणाले.
या वारकरी साहित्य परिषदेने वारकरी संप्रदायाचा प्रसार व प्रचार होण्यासाठी एवढेच नाहीतर गावागावात हा संप्रदाय पोहचविण्याठी गाव तिथे वीणा,टाळ,मृदंगाची मागणी केली होती त्यानुसार पहिल्या टप्प्यात अकरा गावांना टाळ,मृदंग, आणी वीणाचे वाटप या प्रसंगी पालीमंत्री सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल परिषदेच्या वतीने विठ्ठल पुरस्कार देऊन यावेळी पाच जणांना सन्मानित करण्यात आले. या साहित्य परिषदेस पंचक्रोशीतील वारकरी,शेतकरी,माताभगिनीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
