तारापूर औद्योगिक सुरक्षा विभाग अकार्यक्षम..
तारापूर औद्योगिक सुरक्षा विभाग अकार्यक्षम..
पालघर, दि. 2 नोव्हेंबर –
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील औद्योगिक सुरक्षा विभाग अकार्यक्षम असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. बोईसर मधील भगेरिया कंपनीत स्फोट झालेल्या दुर्घटनाग्रस्त ठिकाणी अंबादास दानवे यांनी पाहणी केली, त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.
बोईसर मधील भगेरिया कंपनीत मागील आठ दिवसांपूर्वी स्फोट होऊन १२ कामगार जखमी तर ३ कामगारांचा मृत्यू झाला. या स्फोटातील जखमी कामगारांची दानवे यांनी बोईसरमधील शिंदे रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.
दुर्घटनाग्रस्त कंपनीची पाहणी करताना कंपनीची बाजू घेतल्याप्रकरणी दानवे यांनी सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं . रिऍक्टर आणि बॉयलर बाबत सरकारने योग्य कायदे करण्याची आवश्यकता असल्याचं सांगत या कंपन्यांवर नियंत्रण ठेवणारे अधिकारी आणि कंपन्यांचे साटेलोटे असल्याचे म्हणत कामगारांना नाहक जीव गमावा लागत असल्याचा आरोप दानवे यांनी केला.
केमिकल्स कंपनीत कुशल कामगारांची नेमणूक करण्याऐवजी अकुशल कामगारांचा भरणा होत असल्याचे निदर्शनास आल्याचे देखील दानवे म्हणाले. या औद्योगिक वसाहतीत वारंवार होणाऱ्या दुर्घटनेला फॅक्टरी प्रशासनाची मस्ती व बेफिकीरपणा जबाबदार आहे. या दुर्घटनेबाबत प्रयोगशाळेतून अहवाल आल्यावर दोषींवर योग्य ती कारवाई होईलच असा विश्वास दानवे यांनी जखमींना दिला..
