‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’ चे काय झाले ?
‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’ चे काय झाले ?
यवतमाळ, दि. २० सप्टेंबर –
राज्यात शेतकऱ्यांच्या मोठया प्रमाणात आत्महत्या होत आहेत ही विघातक परिस्थिती आहे. राज्याला शेतकरी आत्महत्यामुक्त करु हे मुख्यमंत्र्यांनी दिलेले अभिवचन घोषणेत विरले अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
अतिवृष्टीमुळे झालेले खरीप पिकांचे नुकसान, नुकसानग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेली अपुरी मदत, जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्था आदी विषयांवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला.
अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत, त्यामुळे आज विदर्भाचा दौरा या जिल्ह्यातून सुरू केला आहे. शेतकरी आत्महत्येमुळे राज्याला काळा डाग लागतो. शेतकरी हिताच्या अनेक योजना असून त्याची योग्य ती अंमलबजावणी होत नसल्याची खंत दानवे यांनी व्यक्त केली.
योग्य प्रचार व प्रसाराअभावी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी असलेल्या पोखरा योजनेचा लाभ तळागळ्यातील शेतकऱ्यांपर्यंत न पोहचल्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
पोखरा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी त्याचा योग्य प्रचार प्रसार करा. शेतात योग्य पीक येण्यासाठी मातीचे परीक्षण करा, पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्या, सामाजिक दायित्व म्हणून शेतकऱ्यांना सहकार्य करा अशा सूचना दानवे यांनी यावेळी केल्या.
