रेल्वे परीक्षार्थींना राज्यातीलच परीक्षा केंद्र द्या.
रेल्वे परीक्षार्थींना राज्यातीलच परीक्षा केंद्र द्या.
मुंबई,दि. 17 सप्टेंबर : –
केंद्र सरकारच्या रेल्वे ग्रुप डी २०१९ परीक्षेसाठी बसलेल्या परीक्षार्थींना महाराष्ट्रातील केंद्र देण्यात यावे अशी मागणी करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.
राज्यातील अनेक विद्यार्थी हे या परीक्षेला बसले आहेत. बहुतांश विद्यार्थी हे नाशिक जिल्ह्यातील असून त्यांना गुजरात राज्यातील परिक्षा केंद्र देण्यात आलं. या परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे याबाबत तक्रार करून जवळचे केंद्र देण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली होती. त्यावर विरोधी पक्षनेते दानवे यांनी तात्काळ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांच्याशी फोनवर बोलून यावर तोडगा काढून विद्यार्थ्यांना जवळचे केंद्र देण्याची मागणी केली. त्यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांनी माहिती घेऊन त्यावर कार्यवाही करणार असल्याचे म्हटले.
परीक्षा विद्यार्थ्यांनी फॉर्म हा मध्य रेल्वे विभागात भरलेला होता. परीक्षा केंद्र हे नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, मुंबई, पुणे, जळगांव येथे उपलब्ध होते. मात्र त्यांना गुजरात राज्यातील केंद्र देण्यात आले. अनेक परीक्षार्थी हे ग्रामीण भागातील असून त्यांना लांबच्या परीक्षा केंद्रामुळे परीक्षेला मुकावे लागू नये यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले.
