गुरुजी म्हणाले, हुश्य…सुटलो बुवा !
मुंबई, दि. १७ ऑगस्ट….
राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. कोरोना संबंधित कामासाठी ज्या शिक्षकांच्या सेवा शासनाने अधिग्रहित केलेल्या आहेत त्या शिक्षकांना संबंधित कामातून कार्यमुक्त करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे. तसे आदेशही शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहेत.
सरप्लस असणाऱ्या व सद्यस्थितीत कोणत्याही आस्थापनेवर समायोजन न झालेल्या शिक्षकांना ते रहात असलेल्या ठिकाणाजवळील शाळेत बोलावून त्यांचा उपयोग ऑनलाईन शिक्षणासाठी करण्यात यावा असेही या आदेशात म्हटले आहे.
कोरोनाचे संकट वाढत असताना शासनाच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांबरोबर शिक्षकांनाही कोरोनाच्या ड्युटीवर लावले होते. लोकांना घरपोच राशन देण्याचे कामही या शिक्षकांकडून करुन घेतले जात होते. जे शिक्षक कोरोनाच्या ड्युटीवर येत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही यापूर्वी स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी यांनी दिला होता परंतु शिक्षण विभागाने आता या शिक्षकांना कोरोना ड्युटीतून मुक्त करुन मोठा दिलासा आहे.
