वेठबिगारीसाठी मुलं विकत घेणाऱ्या दलालांवर कारवाई करा
वेठबिगारीसाठी मुलं विकत घेणाऱ्या दलालांवर कारवाई करा..
इगतपुरी, दि. 11 सप्टेंबर –
वेठबिगारी करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या परिस्थितीचा फायदा घेत कोवळ्या मुलांना विकत घेणाऱ्या दलालांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. यासाठी सरकारला निवेदन देऊन त्यावर कारवाई करण्यासाठी सरकारला भाग पाडू असे दानवे म्हणाले.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज इगतपुरी येथील उबाडे गावच्या कातकरी पाड्यावर भेट दिली. तसेच मृत बालिका गौरी आगिवले हिच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले, त्यावेळी ते बोलत होते.
आदिवासी समाजाच्या हलाखीच्या परिस्थितीचा फायदा घेत कोवळ्या मुलांना कामासाठी राबवणं ही इगतपुरीतील घटना विकसित समाजाला काळिमा फासणारी आहे. बालप्रतिबंध कायद्याअंतर्गत दर तीन वर्षाने सर्व्हे केला जातो. मात्र या सर्व्हेत अधिकाऱ्यांना ही मुलं दिसली नाही का असा सवाल दानवे यांनी उपस्थित करत हा सर्व्हे एकप्रकारे कागदोपत्री झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
इगतपुरीच्या दुर्घटनेचा आढावा घेत विरोधी पक्षनेते दानवे यांनी मृत बालिकेच्या तपासाची माहिती घेऊन आरोपींना लवकरात लवकर पकडण्याच्या सूचना केल्या. तसेच या परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत, त्यामुळे त्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याचे निर्देशही पोलिसांना दिले.
आदिवासी विकास आयुक्त यांच्याकडे या आदिवासी पाड्यांमध्ये पिण्याचे पाणी, अन्नधान्य पुरविणे, सौर दिवे लावण्यात यावे अशा सूचना केल्या, त्या तात्काळ मान्य करण्यात आल्या असून लवकरच त्या उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी अप्पर आयुक्त संदीप गोलाईत,प्रमुख अधिकारी तथा सह जिल्हाधिकारी वर्षा मिना, विस्तार अधिकारी प्रमिला सावंत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ग्रामीण माधवी कांगणे, कामगार उपआयुक्त विकास माळी, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार निर्मला गावित, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव,, तालुका प्रमुख राजू नाठे, सरपंच अनिल गोवर्धने, माजी आमदार गोंगड बाबा आदी उपस्थित होते.
