बारामतीत सुर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल पण….!
बारामतीत सुर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल पण….!
मुंबई, दि. ७ सप्टेंबर –
बारामतीमधील जनता कशी आहे याची माहिती असून त्यामुळे कुणीही बारामतीत आले तरी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रियाताई सुळे आणि अजित पवार यांना मिळतेच. बारामतीत सुर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल परंतु बारामती पवारांना सोडणार नाही एवढं ते घट्ट नातं आहे असे सडेतोड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाला दिले आहे.
एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो तो त्रास बारामतीत भाजपला होत आहे. बारामतीत उमेदवार कोण द्यायचा हे भाजप ठरवेल. बारामती सध्या भाजपने टार्गेट केली आहे शिवाय आमच्याकडेही टार्गेट केले आहे. असे वातावरण तयार करायचे की आम्ही सर्वात मोठ्या लोकांना टार्गेट करतोय अशी भाजपची मीडियासमोर जाण्याच्या पध्दती आहेत. मात्र थोड्या दिवसात आमचाही प्लॅन मांडेन त्यावेळी कुणाकुणाला टार्गेट करतोय हे तुमच्याही लक्षात येईल असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला.
सत्ता आहे तर सत्तेत राहून लोकांची कामे करायची सोडून अशा तयारीला लागले आहेत.याचा अर्थ भाजपला आपली लोकप्रियता कमी व्हायला लागलीय हे लक्षात यायला लागले आहे आणि जेव्हा त्यांची लोकप्रियता कमी होते तेव्हा अशा गोष्टी भाजप करते असा हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने विधान सभेचे तिकीट नाकारले होते…ते का नाकारले याची चर्चा करु इच्छित नाही परंतु बावनकुळे यांनी शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यांवर अशा पध्दतीने बोलणे त्यांना शोभत नाही असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
