१५० दिवस, ३५०० किमीची काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा ७ सप्टेंबरपासून !

0
IMG-20220905-WA0046

१५० दिवस, ३५०० किमीची काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा ७ सप्टेंबरपासून !

मुंबई, दि. ५ सप्टेंबर :

सध्या देशातील परिस्थिती चिंतेची असून विविधेत एकता असलेल्या देशात आज द्वेषाचे, विषमतेचे बिज पेरले जात आहे. देशाची अखंडता धोक्यात आली आहे. महागाई, बेरोजगारीसारखे प्रश्न बिकट झाले आहेत परंतु केंद्रातील मोदी सरकार या ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून इतर मुद्दे पुढे केले जात आहेत. देशाची अखंडता अबाधित रहावी यासाठी काँग्रेस पक्ष राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेचे आयोजन केले असल्याची माहिती मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री जितू पटवारी यांनी दिली.

गांधी भवन येथे भारत जोडो पदयात्रेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना जितू पटवारी पुढे म्हणाले की, ही पदयात्रा १२ राज्ये व २ केंद्र शासित प्रदेशातून १५० दिवसात ३५०० किलोमीटरची असेल. यात्रेदरम्यान राहुलजी गांधी विविध समाज घटकांशी संवादही साधणार आहेत. देशातील ज्वलंत प्रश्नांचा उहापोहही केला जाणार आहे. १० टक्के लोकांकडे ५० टक्के संपत्ती व ५० टक्के लोकांकडे १० टक्के संपत्ती अशी विषमता देशात वाढीस लागली आहे. २७ कोटी लोक पुन्हा दारिद्र्यरेषेच्या खाली गेले. ८० कोटी लोकांना केंद्र सरकार मोफत राशन देत आहे, ही भयानक परिस्थिती झाली आहे. देशातील आर्थिक विषमता, सामाजिक विभाजन, अर्थव्यवस्थेचा उडालेला बोजवारा, राजकीय केंद्रीकरण या मुद्द्यांवर या यात्रेदरम्यान प्रकाश टाकला जाणार आहे. देश सर्व जाती धर्माचा असून सामाजिक सौहार्द बिघडवण्याचे काम मागील काही वर्षात केले जात आहे. देशाची ही एकता पुन्हा कायम ठेवण्यासाठी भारत जोडो यात्रा महत्वाची आहे.

यावेळी बोलताना विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी महात्मा गांधी यांनी १९४२ साली चले जावचा नारा दिला आणि अख्खा देश एकटला होता आता पुन्हा एकदा जुलमी सरकारच्या विरोधात एक होण्याची वेळ आली आहे. माणसा माणसांमध्ये भेद करण्याचे, विषमतेचे, द्वेषाचे राजकारण मागील काही वर्षांपासून वाढीस लागले असून याला छेद देऊन एकोपा निर्माण करण्याची गरज आहे. लोकशाही, संविधान धोक्यात आले आहे, अशावेळी देशाच्या एकतेसाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची असून त्यासाठीच भारत जोडो यात्रा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ही यात्रा देगुलर येथे ७ नोव्हेंबरला प्रवेश करेल व नांदेड मार्गे पुढे १६ दिवसात ३८३ किमीचे अंतर राज्यातून पार करेल. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आणखी दोन दिवस महाराष्ट्रात या यात्रेचा कार्यक्रम वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *