उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन
उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन….
मुंबई, दि. ४ सप्टेंबर :-
उद्योजक सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन धक्कादायक आहे. तरूण, कर्तबगार उद्योजकाचे जाण्याने उद्योग विश्र्वाची हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ‘टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. ते केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. सायरस मिस्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
प्रसिध्द उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनाने भारतीय उद्योग क्षेत्राचे मोठे नुकसान झाले असून भारताने कर्तृत्ववान सुपुत्र गमावला आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्योगपती सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, टाटा सन्सचे माजी प्रमुख प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूने भारतीय उद्योग जगताची मोठी हानी झाली आहे. भारताने एक महान सुपुत्र गमावला आहे. भारतीय उद्योग क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्ववाने त्यांनी वेगळी छाप उमटवली होती, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्योगपती सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
