मुंबई मेट्रो कार डेपोचा वाद पर्यावरणापेक्षा राजकीय !

0
images (53)

मुंबई मेट्रो कार डेपोचा वाद पर्यावरणापेक्षा राजकीय !

मुंबई, दि. 31 ऑगस्ट:

मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाचे नियोजीत वेळेनुसार काम झाले असते तर पहिला टप्पा 2023 मार्चपर्यंत पूर्ण धावू शकला असता. मात्र, मध्ये जे काही वादविवाद झाले, प्रकल्पाला स्थगिती आली. त्यामुळे पहिला टप्पा आता 2023 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रयत्न केले नसते तर डिसेंबर पर्यंतही हा प्रकल्प धावू शकला नसता. प्रकल्प आणखी लांबला असता तर 20 हजार कोटींच्या या प्रकल्पाची किंमत आणखी 15 हजार कोटींनी वाढली असती. त्याचा भार तिकिटांच्या माध्यमातून सामान्य मुंबईकरांवरच आला असता. मेट्रोच्या कार डेपोवरून जो काही वाद झाला तो पर्यावरणापेक्षा राजकीय अधिक आहे असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

फडणवीस म्हणाले, प्रकल्पाचा सर्व बाजूने विचार करूनच उच्च न्यायालय, हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयाने प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा फायदाच होणार आहे. या मेट्रोतून 17 लाख नागरिक प्रवास करतील. त्यामुळे रस्त्यावरील 7 लाख वाहने कमी होणार आहेत. त्यामुळे शहराचे कार्बन उत्सर्जन प्रचंड कमी होईल व मुंबईकरांना प्रदुषणमुक्त श्वास घेता येईल.

मुंबई मेट्रो 3 ही मुंबईची महत्त्वाची लाईफ लाईन बनणार आहे. या प्रकल्पाची महत्त्वपूर्ण चाचणी यशस्वी झाली आहे. या मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. या मेट्रोमुळे रस्त्यावरील खाजगी वाहतूक कमी होणार असल्याने सुमारे 2.30 लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होईल. जी झाडे तोडावी लागली त्यांनी जितके कार्बन शोषून घेतले असते, मेट्रोमुळे केवळ ८० दिवसात तेवढे कमी उत्सर्जन होईल, असे त्यांनी सांगितले. हरित लवाद तसेच सर्वोच्च न्यायालयाने सर्व घटकांचा परामर्श घेऊन या प्रकल्पाला परवानगी दिली असल्याने पर्यावरणाचा विचार करूनच मुंबईच्या हितासाठी जो निर्णय घेणे आवश्यक होते, ते निर्णय शासनाने घेतल्याचे ते म्हणाले. या मेट्रो लाईन मुळे मुंबईतील प्रवाशांना मोठा लाभ होणार असल्याने हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर आत्मीय समाधान लाभेल, असे त्यांनी सांगितले.

मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी प्रास्ताविकाद्वारे मेट्रो ३ ची वैशिष्टे सांगून डिसेंबर 2023 पर्यंत या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

मुंबई मेट्रो लाईन ३ (कुलाबा- बांद्रा-सिप्झ कॉरिडॉर) ट्रेन्सची ठळक वैशिष्ट्ये
मुंबई मेट्रो लाईन -३ च्या ट्रेन्स ८ डब्यांच्या असतील. ७५% Motorisation मुळे गाड्यांच्या धावण्याची कार्यक्षमता उत्तम राहील.

रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे सुमारे ३० टक्के विद्युत उर्जेची बचत होईल आणि चाकांची तसेच ब्रेक ब्लॉक्स इत्यादी उपकरणांची झीज कमी होईल.

एका गाडीतून अंदाजे २४०० प्रवासी प्रवास करू शकतील.

८५ किमी प्रतितास अशा प्रत्यक्षातील प्रचालन वेगामुळे प्रवाशांचा एकूण प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होईल.

स्टेनलेस स्टीलच्या वापरामुळे मेट्रोचे डबे किमान ३५ वर्षे टिकू शकतील.

ट्रेन प्रचालन साठी चालक विरहित प्रणाली स्वीकारली असून अत्याधुनिक कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) च्या सिग्नल व्यवस्थेमुळे १२० सेकंदची frequency ठेवणे शक्य होणार आहे.

प्रवाशांच्या सुलभतेसाठी डब्याच्या प्रत्येक बाजूला चार दरवाजे असतील.

स्वयंचलित प्रकाश नियंत्रण वैशिष्ट्यासह अद्ययावत वीज प्रणाली ऊर्जेचा वापर कमी करण्यास मदत करेल.

ट्रेनच्या छतावर स्थित व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी (VVVF) प्रणालीद्वारे वातानुकूलन यंत्रणेचे नियंत्रण केल्याने ४ ते ५ टक्के ऊर्जा बचत होईल.

डब्यांमध्ये वातानुकूलन यंत्रणेअंतर्गत कार्बन डायऑक्साइड आणि आर्द्रतेसाठी स्वयंचलित नियंत्रण प्रणाली असल्याने सर्व हवामान परिस्तिथीमध्ये प्रवाशांना उत्तम आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल.

रोलिंग स्टॉक आणि ट्रॅक या दोन्हीच्या डिझाइनची योग्यता सिद्ध करून आवश्यतेप्रमाणे पुढील नवीन तांत्रिक सुधारणा अंमलात आणता याव्यात म्हणून ‘मुंबई मेट्रो लाइन -३’ या संपूर्ण भूमिगत मर्गिकेवर आज ट्रेन चाचणी करण्यात आली.

सेवा चाचण्यांचे नियोजन लाईन 3 साठी डेपो सुविधेसोबत आवश्यक संख्येने ट्रेन संच उपलब्ध झाल्यानंतर केले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *