गोविंदांच्या शासकीय नोकरीवरून गैरसमज पसरवू नका !
गोविंदांच्या शासकीय नोकरीवरून गैरसमज पसरवू नका !
मुंबई, दि. २१ ऑगस्ट :
दहीहंडीला साहसी खेळ म्हणून मान्यता दिली की लगेच उद्या त्याची अंमलबजावणी होईल आणि सर्व गोविदांना नोकरी मिळेल, असा चुकीचा गैरसमज विरोधक पसरवत आहेत. क्रीडा क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती , संस्था या सर्वांशी विचार विनिमय करीत नियमावली तयार करण्यात येईल. या निर्णयाकडे खिलाडूवृत्तीने आणि सकारात्मक भावनेतून पाहणे आवश्यक असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले.
गेल्या अनेक वर्षांपासूनची दहीहंडी या हिंदूंच्या पारंपरिक सणाला साहसी खेळ म्हणून मान्यता देण्याची मागणी युती सरकारने मान्य करणे, ही निश्चितपणे आनंददायी बाब आहे. हा खेळ देशपातळीसह जागतिक पातळीवर जाईल. सध्या जे खेळाडूंना आरक्षण आहे त्यामध्येच दहीहंडी या खेळाचा समावेश होणार आहे. या निर्णयाचा एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर काहीही वेगळा परिणाम होणार नाही. पूर्वीच्या साहसी खेळामध्ये या खेळाचा समावेश होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत काम करीत आहे. दहीहंडी हा हिंदूंचा पारंपरिक सण असून यास साहसी खेळ म्हणून मान्यता मिळवून दिल्यामुळे भारताचे नाव जागतिक पातळीवर जाईल. सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून दहीहंडी या खेळाबाबतची नियमावली क्रीडा खाते तयार करणार आहे. दहीहंडीला साहसी खेळ म्हणून मान्यता दिल्यामुळे गोविंदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे सामंत म्हणाले.
‘प्रो गोविंदा स्पर्धा’ पुढच्या वर्षीपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकारने घेतलेला आहे. मुंबईमध्ये जय जवान संघाने नऊ स्तराची दहीहंडी लावून एक वेगळा विश्वविक्रम केल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली.
