….’त्यांना’ बाहेरचे विशाल जग संपल्यासारखे वाटायला लागतेच!
….’त्यांना’ बाहेरचे विशाल जग संपल्यासारखे वाटायला लागतेच!
मुंबई, दि. 20 ऑगस्ट :
आपण घरात बंद खोलीत बसून राहिलो की, बाहेरचे विशाल जग संपल्यासारखे वाटायला लागतेच, असा टोला लगावत भाजपा नेते आणि मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी सेनेला प्रतिउत्तर दिले.
भाजपाच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर टीका करीत शिवसेनेने प्रसिध्दीपत्रक काढले होते. त्याला पुन्हा आमदार आशिष शेलार यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
यामध्ये आशिष शेलार म्हणाले की, हिंदूत्वाचा ज्वलंत विचार जगणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न त्यांच्या सुपुत्रांना पुर्ण करण्यास नाही जमले…म्हणून त्यांना मानणाऱ्यांनी ते पुर्ण करु नये का? ते इतरांनी पुर्ण केले म्हणून त्यांच्या मुलांनी एवढे चिडावे का? आपल्या वडिलांच्या विचारांनी झपाटून समाजातील लोक, आयुष्य खर्च करुन आपल्या वडिलांचे स्वप्न पुर्ण करतात…याचा, त्यांच्या सुपुत्रांना आनंदच व्हायला हवा ना? पेला अर्धा भरला आहे, असेही म्हणता येते पेला अर्धा रिकामा असेही म्हणता येते! फक्त, भरला आहे म्हणायला मोठे मन लागते’ असा टोला ही त्यांनी लगावला आहे.
उरला प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पर्व संपत आले म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव भाजप वापरते असे जे सुपुत्रांना वाटतेय…हे म्हणजे अती झाले आणि हसू आले…! पण काय करणार? आपण घरात बंद खोलीत बसून राहिलो की, बाहेरचे विशाल जग संपल्यासारखे वाटायला लागतेच, असा सनसनाटी टोला त्यांनी लगावला.
