तात्पुरत्या सरकारमध्ये मुंबईच्या विकासकामांचा खोळंबा
तात्पुरत्या सरकारमध्ये मुंबईच्या विकासकामांचा खोळंबा…
मुंबई, दि. 16 ऑगस्ट :
महाविकास आघाडी सरकार असताना मुंबईकरिता एमएमआरडीएकडून महत्वाचे प्रकल्प सुरू करण्यात आले. परंतु सध्याच्या या तात्पुरत्या सरकारमध्ये मुंबईचा कुठेही आवाज नाही, विकास कामांना कुठेही महत्व दिले जात नाही. केवळ राजकारणावर या सरकारचा फोकस असल्याची टीका माजी मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली.
मुंबईची वाहतूक सुरळीत आणि वेगवान करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मुंबई पार बंदर प्रकल्प कामाची पाहणी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. त्यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, शिवडी ते रायगड मधील न्हावा-शेवा बंदराला जोडणारा २२ किमी लांबीचा हा भारतातील पहिला सर्वात मोठा समुद्री पूल म्हणून ओळखला जाणार आहे . या प्रकल्पाच्या एमटीएचएल प्रकल्पातील पहिला गर्डर तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या हस्ते जानेवारी २०२२ रोजी टाकण्यात आला होता. दरम्यान या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळापासून प्रत्येक टप्प्यावर आपण लक्ष ठेऊन असून काही नतद्रष्ट मंडळींच्या कपटी कारस्थानामुळे मविआ सरकार कोसळले. मात्र तोपर्यंत आम्ही घेत असलेल्या साप्ताहिक बैठकी आणि मासिक पाहणी दौरे यामुळे २०२० पासून या प्रकल्पाचे जवळपास ५५ टक्के काम पूर्ण झाले. आज सत्तेमध्ये मुंबईला प्रतिनिधित्व नसले तरी आम्ही मुंबईसाठी नेहमीच आवाज उठवत राहू. मुंबई आणि महानगर क्षेत्राला कनेक्टिव्हिटीचा अद्ययावत पर्याय देणाऱ्या एमटीएचल प्रकल्पासाठी आम्ही आजही कटिबद्ध आहोत. असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबईची वाहतूक सुरळीत आणि वेगवान करण्यात मुंबईच्या पूर्व किनाऱ्याला पश्चिम किनाऱ्याशी जोडणारा वरळी-शिवडी कनेक्टर महत्त्वाचा ठरेल. या प्रकल्पासाठी पुढाकार घेण्यापासून दर आठवड्याला त्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावरील प्रगती पाहताना मला खूप आनंद वाटतो. कोणत्याही पायाभूत प्रकल्पाचे स्वप्न पाहणे आणि त्याची अंमलबजावणी करणे यामध्ये शाश्वत विकास, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि कमीत कमी अडथळे, हे जबाबदारीचे प्रमुख टप्पे आहेत. आमच्या सर्व साप्ताहिक बैठकीत मी या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केल्या, ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे, असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले.
