महानगरपालिकेकडूनच राष्ट्रध्वज संहितेचा अपमान
महानगरपालिकेकडूनच राष्ट्रध्वज संहितेचा अपमान…
मुंबई, दि 13 ऑगस्ट :
‘हर घर तिरंगा’ मोहिमेसाठी राज्यात बहुतांश जिल्ह्यांत वितरण करण्यात आलेले लाखो राष्ट्रध्वज संहितेनुसार तयार झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका करोडो रूपये ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेसाठी खर्च केले जात आहेत, तरी देखील राष्ट्रध्वज संहितेनुसार नाहीत. हा राष्ट्रध्वज संहितेचा अपमान आहे, अशी टीका प्रीती शर्मा मेनन यांनी केली.
भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी घरा घरात तिरंगा देण्यात येत आहे यावर बोलताना प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या की, महापालिकेनं यासाठी जवळपास ३५ लाख ध्वजांची खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर महापालिकेने खरेदी केलेल्या ३५ लाख ध्वजांपैकी तब्बल दीड लाख ध्वज हे सदोष असल्याचं समोर आलं आहे. महानगरपालिकेने राष्ट्रध्वजासाठी कंत्राट देताना कंत्राटदाराची चौकशी केली नव्हती का? सदोष झेंडे येतात तरी कसे? असा प्रश्न प्रीती शर्मा मेनन यांनी उपस्थित केला.
सदोष झेंडे येतातच कसे? महानगरपालिका घोटाळ्यांची पालिका म्हणून ओळखली जाते. घोटाळ्यात सहभागी होण्याच्या सर्व गोष्टींपैकी, राष्ट्रध्वजाच्या बाबतीत बेजबाबदारपणा ही घृणास्पद आहे. तिरंगा हा भारताचा अभिमान असून या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सर्वांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी प्रीती शर्मा मेनन यांनी केली.
