शिवसेनेत फूट बंडखोरांनी नाही तर भाजपाने पाडली !
शिवसेनेत फूट बंडखोरांनी नाही तर भाजपाने पाडली !
मुंबई, दि. १९ जुलै;
भाजपाच शिवसेना संपवत आहे. दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावत आहे, त्यातील एक कोंबडा मेला की दुसऱ्या कोंबड्याला जेलमध्ये टाकतील आणि त्यांची इच्छा पूर्ण होईल. शिवसेनेत फूट बंडखोरांनी नाही तर भाजपाने पाडली असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
शिवसेना भवनात एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरु असून तुम्ही सतर्क राहा. माझ्या भात्यामधील कितीही बाण न्या पण ते चालवण्यासाठी लागणारं धनुष्य माझ्याकडे आहे.
शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केल्यापासून उद्धव ठाकरे पक्ष संघटनेसाठी वेळ देत आहेत. सातत्याने बैठका घेऊन त्यांना एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आदित्य ठाकरेही शाखांना भेट देत आहेत.
शिवसेनेतील बंडखोर आमदार, खासगार हे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसवर खापर फोडत असताना उद्धव ठाकरेंनी मात्र भाजपावर तोफ डागली आहे हे विशेष.
