‘त्या’ चार मृत मजुरांच्या कुटूंबियांना 5 लाखांची मदत !
‘त्या’ चार मृत मजुरांच्या कुटूंबियांना 5 लाखांची मदत !
मुंबई, दि. 13 जुलै :
संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नावडी गावात विजेचे जोडकाम करताना अचानक घडलेल्या दुर्घटनेत 4 कंत्राटी मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना समजताच या घटनेची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
कन्नडमध्ये घडलेल्या या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 5 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा असे आदेशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
कन्नड तालुक्यातील नावडी येथे विजेच्या जोडणीचे काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने विजेच्या झटक्याने या मजुरांचा जागच्या जागी मृत्यू झाला होता. जगदीश मुरकुंडे, भारत वरकड,अर्जुन मगर,गणेश थेटे अशी या मजुरांची नावे आहेत.
संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांना फोन केला. यावेळी त्यांनी या घटनेची माहिती घेऊन बोरनारे त्यांना या कंत्राटी मजुरांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत तातडीने देण्याचे निर्देश दिले. तसेच शासकीय मदत देखील लवकरच देण्यात येईल असेही स्पष्ट केले
