सुप्रीम कोर्टाने कोणाला दिलासा दिला, ठाकरे की शिंदे गटाला ?
सुप्रीम कोर्टाने कोणाला दिलासा दिला, ठाकरे की शिंदे गटाला ?
मुंबई, दि. २७ जून :
ठाकरे सरकार व एकनाथ शिंदेंची बंडखोरी आता सुप्रीम कोर्टात गेली असून यावर सुनावणी सुरु आहे. सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला मोठा दिलासा देत १२ जुलैपर्यंत बंडखोर आमदारांवर अपात्रतेसंदर्भातील कोणतीही कारवाई करु नये असा आदेश दिला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, प्रतोद सुनील प्रभू आणि नव्याने नियुक्ती झालेले गटनेते अजय चौधरी यांनाही कोर्टाने नोटीस पाठवली आहे. पाच दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
आमदारांना १२ जुलैपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ दिली आहे. त्यामुळे १२ जुलैपर्यंत आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही. ११ जुलैपर्यंत आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे आश्वासन उपाध्यक्षांची बाजू मांडणारे वकील धवन यांनी दिले.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी, प्रतोद सुनील प्रभू यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे. आपलं म्हणणं मांडण्यासाठी तिन्ही पक्षांना वेळ देण्यात आला आहे. पाच दिवसांत त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.केवळ अविश्वासाच्या या ठरावामुळे विशेष अधिवेशन बोलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नियमांनुसार यासाठी परवानगी नाही. मुख्यमंत्र्यांवर अविश्वास दाखवण्यासाठी कोणतंही कारण देत नाही. पण अध्यक्षांचा संबंध येतो तेव्हा कलम १७९ नुसार ठोस कारण द्यावं लागेल. सदस्यांना फक्त विश्वास नाही असं सांगता येणार नाही असा युक्तिवाद शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी केला आहे.
कोर्टाच्या या आदेशामुळे बंडखोरांना मोठा दिलासा मिळाला आहे…पण अजून लढाई बाकी आहे..
