…. आता लोकसभा व विधानसभाही स्वबळावर जिंकू

0
IMG-20220611-WA0049

…. आता लोकसभा व विधानसभाही स्वबळावर जिंकू.

मुंबई, ११ जून :

भारतीय जनता पार्टीला राज्यसभा निवडणुकीत मिळालेला विजय ही सुरुवात असून यापुढे महानगरपालिका, जिल्हा परिषदा निवडणुका तसेच २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही भाजपा स्वबळावर दणदणीत विजय मिळवेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उत्सवामध्ये भाजपाचे विजयी उमेदवार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, भाजपा किसान मोर्चा राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे आणि प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांचा सत्कार पक्षाचे निवडणूक प्रभारी व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. भाजपाचे प्रदेश पदाधिकारी, आमदार तसेच कार्यकर्त्यांच्या उत्साही गर्दीत जल्लोष करण्यात आला. ढोल – ताशांचा कडकडाट आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांच्या दणदणाटात फुलांची उधळण करून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर अजून मोठी लढाई बाकी आहे. महाराष्ट्रामध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा दणदणीत विजय मिळवेल. त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही भाजपा स्वबळावर सरकार आणेल. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीतही आपल्याला यश मिळवायचे आहे. मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रात सर्वत्र भाजपाचा भगवा ध्वज फडकवायचा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हा उत्साह कायम ठेवावा.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेऊन भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा देत शिवसेनेसह सत्ता दिली होती. पण आमच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही जी सत्ता मिळवली ती तरी चांगली चालवून दाखवा. राज्यातील विकासकामे थांबली आहेत. जे काही प्रकल्प चालू आहेत ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे आहेत. शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, प्रकल्प बंद आहेत, विजेचा तुटवडा आहे, जीएसटीचे पैसे मिळाले तरी पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्यास राज्य सरकार तयार नाही. महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी याचा अंतर्मुख होऊन विचार करावा.

भारतीय जनता पार्टीचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी प्रकृती बरी नसतानाही मुंबईत येऊन मतदान केले त्यामुळे भाजपाचा तिसरा उमेदवार सहजपणे विजयी झाला. त्याबद्दल त्यांचे आभार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीने कठोर भूमिका घेतल्यामुळे राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करावे लागले. देवेंद्र फडणवीस यांनी अचूक रणनिती बनवून भाजपाच्या तिन्ही उमेदवारांना विजयी केले. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापेक्षा भाजपाच्या उमेदवाराला अधिक मते मिळाली. या निवडणुकीतील यशानंतर चित्र बदलेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *