… तर राज ठाकरेंच्या रक्षणाची जबाबदारी आदित्यनाथ सरकारची !
… तर राज ठाकरेंच्या रक्षणाची जबाबदारी आदित्यनाथ सरकारची !
मुंबई, दि. 10 मे :
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौ-याला तीव्र विरोध होत आहे. माफी मागितल्याशिवाय अयोध्येत राज ठाकरेंना पाय ठेवू देणार नाही असा पवित्रा काही उत्तर भारतीय लोकांनी घेतला आहे. अशा परिस्थितीत राज ठाकरेंनीही ताणून धरू नये. संतांपुढे नतमस्तक झाले तर त्यात कमीपणा नाही हे नवहिंदूत्ववादी राज ठाकरेंना माहीत नसावे पण माफी न मागता राज ठाकरेंना जायचे असेल तर त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आदित्यनाथ सरकारची आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौ-यावर बोलताना सचिन सावंत म्हणाले की, संविधानाने दिलेल्या अधिकारांवर असंविधानिक पध्दतीने रस्त्यावरचा न्याय वापरुन टांच आणण्याचा प्रयत्न किती चुकीचा असतो याची जाणीव आता राज ठाकरे यांना झाली असेल. त्याच संविधानाने राज ठाकरेंना देशात कोठेही जाण्याचा अधिकार दिला आहे. त्याला आता अयोध्येतील संत मंडळी आव्हान देत आहेत. देशात संविधान हतबल झाले तर काय होईल हे यातून दिसते. २० कोटी मुसलमानांना धर्माचरण करण्याचा अधिकार संविधानाने दिला. त्यांचे रक्षण जर संविधानाला करु दिले नाही तर तेच संविधान तुमचेही रक्षण करण्यास असमर्थ ठरेल.
राज ठाकरेंनी कायम घोर चुका केल्या आता संतमंडळींनी त्या करु नयेत. भगवान श्रीरामांनी तर कैकेयीलाही क्षमा केले. भाजपाने कितीही भडकले तरी संतांना क्रोध शोभा देत नाही असेही सावंत म्हणाले.
