औरंगाबादमधील मनोज आव्हाडच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा
औरंगाबादमधील मनोज आव्हाडच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा.
मुंबई, दि. 2 मे:
औरंगाबाद येथील मातंग समाजातील निरपराध तरुण मनोज शेषराव आव्हाड याची हत्या करणाऱ्यांना राज्य सरकारने अटक करून कठोरात कठोर शिक्षा करावी. या प्रकरणात मयताच्या कुटूंबाला जलदगतीने न्याय मिळावा यासाठी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करून हा खटला जलदगती कोर्टात चालवावा. तसेच मयत मनोज आव्हाडच्या कुटूंबाला राज्य सरकारने वीस लाख रुपयांची मदत करावी अशा मागण्या राष्ट्रीय मातंग महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष व काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केल्या आहेत.
मनोज आव्हाड प्रकरणी राष्ट्रीय मातंग महासंघाच्या शिष्टमंडळाने सुरेशचंद्र राजहंस यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात सुरेश सूर्यवंशी, भगवान कुमठेकर, तानाजी सूर्यवंशी, अनिल कांबळे, व्यंकट कुमठेकर,न्यानोबा कावडे, अनिल माने, संतोष कलकत्ते, मोहन रणदिवे, उत्तम शिंदे, व्यंकट सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
यावेळी मनोज आव्हाडवर झालेल्या अत्याचाराची माहिती नाना पटोले यांनी दिली. नाना पटोले यांनी या प्रकरणी चिंता व्यक्त करून तात्काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून मनोज आव्हाडला न्याय देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मनोज आव्हाडच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होत नाही व त्याच्या कुटूंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रीय मातंग महासंघ व मातंग समाजासाठी लढणाऱ्या संघटनाच्या वतीने राज्यभर सुरू असलेले आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे राजहंस यांनी सांगितले.
