… आपण भिडलो तर विरोधकांचा टिकाव लागणार नाही !
… आपण भिडलो तर विरोधकांचा टिकाव लागणार नाही !
पाटण दि. १८ एप्रिल :
महागाई, बेरोजगारी, आरोग्ययंत्रणा या मुळ विषयावर आज कोण काही बोलत नाही. मात्र ईडी, आयटी, सीबीआय, भोंगा यावर चर्चा सुरू आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले.
जयंत पाटील म्हणाले की, पवित्र गंगेतून मृतदेह वाहताना आपण सर्वांनी पाहिले मात्र महाराष्ट्रात आपण कोरोना काळात एक चांगली कामगिरी केली. आपण चांगल्या कामाच्या जोरावर मतं मागू. सर्व आधुनिक व्यवस्था आत्मसात करू आणि एक चांगले यश संपादित करू. मागच्या निवडणुकीत पाटण इथे पराभव झाला. इंदिरा गांधींचाही पराभव झाला होता मात्र मला इथल्या लोकांचे कौतुक करावेसे वाटते. कार्यकर्त्यांनी इथे पक्ष जिवंत ठेवला आहे. नाराजी असताना लोकांनी पक्षाची साथ सोडली नाही. ही आपल्या पक्षाची जमेची बाजू आहे. ही ताकद एकसंघ करण्याची वेळ आली आहे त्यासाठी बुथ कमिट्यांचे संघटन करा. आपली ताकद प्रचंड आहे, आपण भिडलो तर विरोधकांचा टिकाव लागणार नाही, असा आत्मविश्वास जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांमध्ये भरला.
सगळ्या स्थानिक संस्थांमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुमत आहे. आता पक्ष वाढवायचा आहे, याची जबाबदारी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. पक्षाची नव्याने बांधणी करू, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तोंडावर आहेत. आमचे सैन्य तयार आहे असे सत्यजित पाटणकर यांनी सांगितले.
रामालाही वनवास भोगावा लागला होता तशी आजची परिस्थिती आहे. नव्याने आपण उभे राहूया. मी वडिलधारी आहे, तुम्हाला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. पक्ष आपल्या पाठिशी खंबीर आहे. संघटना मजबूत करा असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
