कोकणाचा शाश्वत विकास पूर्ण करणार.
कोकणाचा शाश्वत विकास पूर्ण करणार.
रत्नागिरी दि. 30 मार्च:
महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील किल्ले संवर्धनाचे मोठे काम राज्य सरकारने हाती घेतले असून, या शासनाच्या माध्यमातून कोकणाचा शाश्वत सर्वांगीण विकास घडवून आणणार अशी ग्वाही पर्यटन पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
दापोली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत रायगड किल्ल्यासाठी 600 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यानंतर कोकणातील सर्वच किल्ल्यांचे संवर्धन करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. त्यासाठी समिती नेमण्यात आली असून, समितीच्या माध्यमातून किल्ले संवर्धनाचे काम केले जात आहे. किल्ले संवर्धनासाठी वेळप्रसंगी दिल्लीकडे पाठपुरावा करावा लागेल तो सुद्धा करू, परंतु कोणत्याही परिस्थितीत किल्ले संवर्धनाचे काम थांबणार नाही. कोकणातील पर्यटन वाढीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. कोकणात रोजगार निर्मिती कशी होईल यादृष्टीने पाठपुरावा केला जात आहे. छत्रपतींच्या पुतळ्याचे बांधकाम स्थानिक माती व स्थानिक जांभा या दगडाने केले असल्याने त्याचे स्वरूप आणि महत्त्व वाढले आहे. पुतळ्याचे बांधकाम राजांना शोभेल असे करण्यात आले आहे.
