नागपूर शहरातील पाचपावली उड्डाणपुल पाडून दोन वर्षात नवा पुल बांधणार.
नागपूर शहरातील पाचपावली उड्डाणपुल पाडून दोन वर्षात नवा पुल बांधणार.
नाना पटोलेंच्या प्रश्नावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे उत्तर…
मुंबई, दि. 9 मार्च :
नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील पाचपावली उड्डाण पुलाची दुरवस्था झाली असून या ठिकाणी नवा उड्डाणपूल बांधणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहे. या पुलाच्या दुरवस्थेबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता.
पाचपावली पुलाचा मुद्दा उपस्थित करताना नाना पटोले म्हणाले की, नागपूर शहरातील उत्तर नागपूर व पूर्व नागपुरला जोडणारा पाचपावली उड्डाणपूल हा महत्वाचा आहे. या पुलाच्या ३० पिलर्सपैकी १० खराब स्थितीत आहेत, ते कधीही पडतील अशी स्थिती आहे. पुल धोकादायक आहे, भविष्यात काही धोका होऊ नये याची काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी तातडीने एक बैठक घेऊन नागपूरकर जनतेचे हित लक्षात घेऊन ह्या पुलाचा प्रश्न लवकर निकाली काढावा. या बजेटमध्ये ह्या पुलासाठी काही तरतूद केली आहे का असा प्रश्न विचारला होता.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले की, नागपूर शहरातील पाचपावली उड्डाणपुलाचे १९८८ साली बांधकाम सुरु करून तो १९९२ साली पूर्ण झाला. हा पुल नागपूर महानगरपालिककडे हस्तांतरीत केलेला आहे. पुलावरील रहदारी वाढलेली असून पुल मात्र धोकादायक नाही परंतु या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करू. NHI च्या माध्यमातून हा जुना पुल पाडून नवा पुल बांधणे प्रस्तावित असून बारा मीटरचा नवा पूल बांधला जाणार आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण होईल व त्यासाठी ६५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे उत्तर दिले.
