पंतप्रधानांसमोरच अजितदादांनी राज्यपालांची केली तक्रार.
पंतप्रधानांसमोरच अजितदादांनी राज्यपालांची केली तक्रार.
पुणे, दि. ६ मार्च:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासमोरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत राज्यपालांना टोला लगावत त्यांच्याबद्दलची एकप्रकारे तक्रारच केली.
अजित पवार म्हणाले, पंतप्रधानांच्या लक्षात मी एक बाब आणू इच्छितो. अलिकडे महत्त्वाच्या पदांवरील सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत. ती वक्तव्य महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला न पटणारी आहेत. ती मान्य देखील होणारी नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजमाता जिजाऊंनी रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी देशात स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. या महामानवांच्या उत्तुंग विचारांचा वारसा आपल्याला महाराष्ट्रात पुढे न्यायचा आहे. मनात कुणाच्याही बद्दल आसूया न ठेवता विकासकामात राजकारण न करता हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे हे मी नम्रतापूर्वक सांगतो.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास स्वामी आहेत हे सांगत रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कोण ओळखले असते असे बोलून राज्यपाला यांनी वाद ओढवून घेतला. तसेच महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई यांच्या विवाहावेळच्या वयावर बोलत कुत्सिपणे हसत विधान केले होते. या दोन्ही प्रसंगावरून राज्यात राज्यपालांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यातच राज्यपाल कोश्यारी व ठाकरे सरकार यांच्यातील संबंध चांगली नसल्याचे चित्र वारंवार दिसत आहे. अजित पवार यांनी योग्य संधीचा फायदा घेत पंतप्रधानांसमोर राज्यपालांचे नाव न घेता टोला लगावला.
