छत्रपती शिवाजी स्वयंभु राजे गुरुची आवश्यकता नव्हती
छत्रपती शिवाजी स्वयंभु राजे गुरुची आवश्यकता नव्हती..
मुंबई, दि. 1 मार्च:
छत्रपती शिवाजी महाराज हे स्वयंभू राजे होते. शौर्य आणि धैर्याचे महामेरू होते, त्यांना गुरूची गरज नव्हती. त्यांच्या खऱ्या गुरू माता जिजाऊ याच होत्या. अन्य कोणी त्यांचा गुरू होऊ शकत नाही असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
रामदास आठवले म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले वक्तव्य मला माहित नाही, त्याबाबत मी लवकरच राज्यपाल यांना भेटून माझे मत सांगणार आहे. रामदास स्वामी यांचे स्थान त्यांच्या जागी आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांना कोणत्याही गुरूची आवश्यकता नव्हती. ते स्वयंभू राजे होते. संपूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानले जाते.
छत्रपती शिवाजी महाराज हे समतेचे तत्व जगणारे राजे होते. त्यांनी सर्व जातीधर्माच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य उभारले. त्यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक करण्यास महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी नकार दिला त्यानंतर काशीहुन आलेल्या गागाभट्टांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केल्याचा इतिहास सर्वश्रुत आहे.
