दक्षिण मुंबई वीज पुरवठा खंडित प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करणार..
दक्षिण मुंबई वीज पुरवठा खंडित प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करणार..
मुंबई, दि. २७ फेब्रुवारी :
दक्षिण मुंबईत वीज पुरवठा खंडित झाल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर स्वतः ऊर्जामंत्री डॉ. राऊत ‘ऍक्शन मोड’मध्ये येत सर्व संबंधित अधिकारी आणि टाटा कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी यांच्याशी सतत संपर्कात होते.
ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, या घटनेची माहिती मिळताच मी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे तसेच महापारेषण व राज्य भारप्रेषण केंद्रातील प्रमुखांशी सतत संपर्कात होतो. वीज पूरवठा तात्काळ पूर्ववत व्हावा यासाठी मी त्यांना सूचना दिल्या आणि या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. टाटा कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशीही प्रत्यक्ष बोलून वीज पुरवठा तात्काळ सुरू होण्याबाबत चर्चा केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष कामावर देखरेख ठेवण्याच्या सूचना दिल्या. विविध कारणांमुळे झालेला हा बिघाड दुरुस्त करून अवघ्या ७० मिनिटात दक्षिण मुंबईतील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीत दोषी आढळणाऱ्यावर उचित कारवाई केली जाईल. वीज पुरवठा पूर्ववत करण्यास प्राधान्य दिल्याने माध्यम प्रतिनिधींना माहिती देण्यास विलंब झाला.
भार नियंत्रणाकरिता नेरुळ – चेंबूर आणि सोनखर – ट्रॉम्बे वाहिन्या एकत्र जोडल्या होत्या. त्या वेगळ्या करण्यासाठी २७ / ०२ / २०२२ रोजी सकाळी ७ वाजता नियोजित कामाकरिता बंद करण्यात आल्या होत्या. सकाळी ०८ : ४४ वाजता मुलुंड – ट्रॉम्बे हि वाहिनी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. त्यानंतर राज्य भारप्रेषण केंद्र ह्याने भार नियंत्रणाकरिता टाटा थर्मल आणि टाटा हायड्रो निर्मिती केंद्रांना ०९ : ३० वाजता निर्मिती क्षमता वाढवण्याचे निर्देश दिले. तथापि DSM च्या VSE च्या माध्यमातून निर्मिती करण्यासाठी टाटाकडून मेल ची मागणी करण्यात आली. ह्या दरम्यान २२० kV कळवा – ट्रॉम्बे हि वाहिनी ०९ : ४९ वाजता BARC च्या कॅम्पसमध्ये वाहिनी खालील जंगलातील आगीमुळे तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. ह्याचा परिणाम ट्रॉम्बे – साल्सेट ह्या वाहिनीवर झाला आणि हि वाहिनी ओव्हरलोड होऊन बंद पडली. ज्यामुळे ट्रॉम्बे निर्मिती केंद्रावर अतिरिक्त भार येऊन वीज निर्मिती संच बंद पडले, परिणाम स्वरूप दक्षिण मुंबईतील कुलाबा, महालक्ष्मी आणि दादर परिसरामध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता.
