आज ना उद्या हे घडेल याची खात्री होतीच !
आज ना उद्या हे घडेल याची खात्री होतीच !
मुंबई, दि. २३ फेब्रुवारी:
नवाब मलिक हे केंद्र सरकारविरोधात जाहीरपणे बोलतात म्हणून त्यांच्यावर ईडीमार्फत कारवाई केली आहे. नवाब मलिक यांना काहीतरी प्रकरण काढून लक्ष्य केले जाणार हे आम्हाला माहिती होते. हा यंत्रणेचा गैरवापर असून आज ना उद्या हे घडेल याची आम्हाला खात्री होती, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली आहे.
ईडीकडे नवाब मलिक यांच्याविरोधात पुरावे असल्याचा दावा फेटाळत शरद पवार म्हणाले की, कसले पुरावे, कसली केस काढली माहिती नाही. एखादा मुस्लीम कार्यकर्ता असला की, काही झाले तरी दाऊदचे नाव काढले जाते आणि कनेक्शन जोडले जाते. माझ्यावरही २५ वर्षांपूर्वी असे आरोप झाले होते. आतादेखील अशाचप्रकारे लोकांना बदनाम केले जात आहे. जे लोक केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांविरोधात स्वच्छपणे भूमिका मांडतात, त्यांना लक्ष्य केले जाते.
नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रावादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी ईडीच्या मुंबईतील ऑफीसबाहेर निदर्शने करुन ईडीविरोधात घोषाणाबाजीही केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
