आपणच पुकारलेल्या आंदोलनातून नाना पटोले गायब
आपणच पुकारलेल्या आंदोलनातून नाना पटोले गायब.
मुंबई, दि, १४ फेब्रुवारी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी वाचाळ वक्तव्ये केली असून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचे आव्हान केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे हे आंदोलन असंवैधानिक असून राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी राज्य सरकारकडे केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला पण पुन्हा एकदा काँग्रेसचा हा डाव भाजपा कार्यकर्त्यांनी उधळून लावला.
यावेळी बोलताना भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टिकास्त्र सोडले. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर आंदोलन करणाऱ्यांना आम्ही उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे हे आंदोलन असंवैधानिक असून राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस सत्तेत असल्याने पोलिसांवर त्यांचा दबाव निर्माण होत आहे. येत्या काळात या दडपशाहीचे उत्तर नक्कीच दिले जाईल. हे आंदोलन अतिशय निंदनीय असून मुंबईकरांच्या मनात एक आक्रोश निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. महाविकास आघाडी सरकार लोकांना कायदे हातात घेण्यासाठी प्रवृत्त करत आहे का?” असा प्रश्न मंगल प्रभात लोढा यांनी उपस्थित केला आहे
