राजभवनवर आम्हीही कधीकधी येते होतो, दररोज नाही !
राजभवनवर आम्हीही कधीकधी येते होतो, दररोज नाही !
मुंबई, दि. ११ फेब्रुवारी:
भाजपा नेते वारंवार राजभवनवर जाऊन महाविकास आघाडी सरकार विरोधात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तक्रारी करत असतात. हाच धागा पकडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला चिमटा काढला. विरोधी पक्षात असताना आम्हीही राजभवनवर कधीकधी येते होतो, दररोज नाही अशी कोपरखळी त्यांनी मारली.
राजभवनातील दरबार हॉलच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आम्ही तेव्हा राज्यपाल महोदयांना भेटायचो, त्यांच्या कानी आमच्या व्यथा घालत होतो. आजसुद्धा आवश्यकता असेल तेव्हा आमचा संवाद सुरु असतो. महाराष्ट्रातील राजकीय हवा कशीही असो पण राजभवनातील हवा नेहमीच थंड असते. महाराष्ट्रातील राजभवन हे देशातील सर्वात सुंदर राजभवन आहे. राजभवनाच्या एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला शहरातील जंगल म्हणावं अशी झाडांची गर्दी आहे. शहरात असूनही पावसाळ्याच्या सुरुवातीला राजभवनात थुईथुई नाचणारे मोर पाहायला मिळतात. तर कधीही याठिकाणी सर्पमित्रांनी पकडलेले विषारी सापही पाहायला मिळतात.
