सरकार पाडण्यास नकार दिल्याने ईडीमार्फत त्रास देण्याचे आदेश !
सरकार पाडण्यास नकार दिल्याने ईडीमार्फत त्रास देण्याचे आदेश !
मुंबई, दि. ९ फेब्रुवारी:
महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मदत करण्यास नकार दिल्यानंतर ईडीने मला व माझ्या कुटुंबीयांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. ईडी आणि अन्य तपास यंत्रणांचे अधिकारी हे आता काही राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. त्यांना त्यांच्या ‘बॉस’कडून मला वठणीवर आणण्यास सांगण्यात आले आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांना पत्र पाठवून खळबळजनक आरोप केले आहेत. माझ्यासह महाराष्ट्र मंत्रिमंडळातील दोन ज्येष्ठ मंत्री व महाराष्ट्रातील दोन वरिष्ठ नेत्यांवर पीएमएलए कायद्यांतर्गत कारवाई करून तुरुंगात टाकण्यात येईल. असे केल्याने राज्यात मध्यावधी निवडणुका लागू होतील असे राऊत यांनी या पत्रात म्हटले आहे. ‘जवळपास एका महिन्यापूर्वी काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधला आणि महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी आम्हाला मदत करावी असे सांगितले. सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यात मी महत्वाची भूमिका पार पाडावी, कारण राज्यात मध्यावधी निवडणुका लागू होऊ शकतील, असे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.
अशा कोणत्याही प्रकारच्या गुप्त अजेंड्याचा भाग होण्यास नकार दिल्यानंतर मला धमकावण्यात आले. तुम्हाला याची मोठी किंमत मोजावी लागेल, अशी धमकीही मला देण्यात आली. इतकंच नाही तर, तुमचे यापुढील दिवस हे एका माजी रेल्वेमंत्र्यांसारखे होऊ शकतात, ज्यांनी अनेक वर्षे तुरुंगात घालवली आहेत, असे धमकावण्यात आल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
