शिवसेनेला संपवण्याचे फडणवीसांचे राजकारण !

0
IMG_20211029_092716

शिवसेनेला संपवण्याचे फडणवीसांचे राजकारण !

मुंबई दि. 25 जानेवारी:
दिल्लीच्या सहकार्याने देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना संपवण्याचे राजकारण केले मात्र आता त्यांना शिवसेना काय आहे हे समजू लागल्याने अशाप्रकारची विधाने ते करत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.

पाच वर्षाचा निकाल पाहिला तर भाजपमुळे शिवसेनेचे खच्चीकरण झाले आहे. उध्दव ठाकरे यांनी २५ वर्ष युतीत सडलो असे विधान केले आहे. मात्र आता शिवसेनेची ताकद वाढताना दिसत आहे. आता जे नगरपालिकांचे निकाल आले त्यावरुन भाजपसोबत राहिल्याने कमकुवत झालेल्या शिवसेनेचा ग्राफ कितीतरी पटीने वाढलेला दिसला असेही नवाब मलिक म्हणाले.

बाळासाहेबांनी युतीचा निर्णय घेतला होता शिवाय हयातीत युतीतून बाहेर पडण्याचा विचारही केला होता. आम्ही कॉंग्रेससोबत असताना सेनेकडून राष्ट्रवादी सोबत आली पाहिजे हा प्रस्ताव होता परंतु काही कारणामुळे जमले नाही असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

२०१९ च्या आधीपासून भाजपसोबत खच्चीकरण होतेय ही चर्चा सुरू होती. भाजप ज्या पक्षांसोबत युती करतो त्यांचे खच्चीकरण करतो हे सेनेला अगोदरच कळले होते त्यामुळे सेनेने भूमिका घेऊन भाजपला बाजूला केले असेही नवाब मलिक म्हणाले.

सेनेसोबत असताना भाजप मोठी झाली हे आता देवेंद्र फडणवीस यांना समजले आहे परंतु आठ वर्षापासून देवेंद्र फडणवीस सेनेला संपवण्याचे राजकारण करत होते असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *