नाना पटोलेंच्या अटकेसाठी मुंबई भाजपाचे साखळी उपोषण
नाना पटोलेंच्या अटकेसाठी मुंबई भाजपाचे साखळी उपोषण..
मुंबई, दि. १९ जानेवारी:
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले असून त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालय परिसरातील गांधीजींच्या पुतळ्याजवळ साखळी उपोषण करण्यात येत आहे. जोपर्यंत पटोलेंवर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण चालूच ठेवणार असा इशारा मंगल प्रभात लोढा यांनी दिला.
नाना पटोले यांचे वागणे म्हणजे “विनाश काले विपरित बुध्दी” असे झाले असून नाना पटोले वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात गरळ ओकत आहेत. आधी पंजाब आणि आता महाराष्ट्रात काँग्रेस नेत्यांचे मोदींना जीवे मारण्याचे उद्देश उघडपणे जनतेसमोर आले आहेत. यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मंत्र्यालयात जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आश्वासन दिले की, योग्य ती कारवाई केली जाईल. जोपर्यंत नाना पटोले यांच्यावर एफ. आय. आर दाखल करुन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील, असा इशारा लोढा यांनी दिला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो, अशा शब्दात गरळ ओकली आहे. नाना पटोले यांच्यावर तात्काळ कारवाई करावी यासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात भाजपा मुंबई तर्फे मंत्रालय परिसरात साखळी उपोषण करण्यात येत आहे.
