पंतप्रधानांच्या जीवाला कोणताही धोका नव्हता !
पंतप्रधानांच्या जीवाला कोणताही धोका नव्हता !
चंदिगड, दि. ५ जानेवारी:
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यावेळी सुरक्षेत अक्षम्य त्रुटी असल्याचा वाद रंगला आहे. भाजपाने या मुद्यावरून पंजाब सरकारवर तोफ डागली असताना पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मोदींच्या जीवाला कोणताही धोका नव्हता, असे चन्नी यांनी म्हटले आहे.
चरणजीत सिंग चन्नी म्हणाले की, आम्ही पंतप्रधान कार्यालयाला कळवले होते की तुम्ही हा दौरा रद्द करावा. पंजाबमधील हवामान खराब होतं. त्यासोबतच शेतकरी आंदोलकांचा मुद्दा देखील अडचणीचा होता. तरीदेखील ते दौऱ्यावर आले. त्यांनी अचानक त्यांच्या मार्गामध्ये बदल केल्याची माहिती आमच्याकडे नव्हती.पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी नव्हती. जर पंतप्रधानांच्या आजच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी असेल, तर आम्ही त्यासंदर्भात चौकशी करू. पंतप्रधानांच्या जीवाला कोणताही धोका नव्हता.
फिरोजपूर जिल्ह्यातून पंतप्रधानांना त्यांचा दौरा अर्धवट सोडून परत जावे लागले याविषयी मी खेद व्यक्त करतो. आम्ही आमच्या पंतप्रधानांचा आदर करतो. पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी मी भटिंडाला जाणे अपेक्षित होते. पण माझ्यासोबत असलेल्यांपैकी काहीजण कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे मी पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी जाऊ शकलो नाही, असेही चन्नी म्हणाले.
