… दुकानदारांना दहा हजारांचा दंड म्हणजे ‘चोर सोडून सन्याशाला फाशी’!
… दुकानदारांना दहा हजारांचा दंड म्हणजे ‘चोर सोडून सन्याशाला फाशी’!
मुंबई, दि.३ जानेवारी:
ग्राहकाने मास्क न वापरल्यास फक्त ५०० रुपये दंड परंतु संबंधित दुकानदाराला मात्र १० हजार रुपयांचा दंड करण्याचा निर्णय राज्य सरकारने तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी मुंबई भाजपाचे अध्यक्ष, आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.
भाजपा व्यापारी सेलच्या शिष्टमंडळाने मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांची भेट घेतली. ग्राहकाने मास्क न घातल्यास दुकानदारांना दहा हजारांचा दंड म्हणजे पद्धतशीर लूटच असून हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी आहे अशी खरमरीत टीका आमदार लोढा यांनी केली.
दुकानदारांना दहा हजार रुपये दंड आकारण्याचा राज्य सरकारचा हा निर्णय अन्यायकारक असून या निर्णयामुळे दुकानदारांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. तसेच लहान दुकानदारांची गैरसोय होणार आहे. या निर्णयामुळे भ्रष्टाचाराचे नवे कुरण निर्माण होईल याकडेही भाजपा व्यापारी सेलच्या शिष्टमंडळाने लक्ष वेधले.
या निर्णयामुळे छोट्या दुकानदारांना दुकान बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही कारण दंडाची रक्कम दुकानदाराच्या कमाईपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या नियमांत सुधारणा करून दुकानदारांना न्याय द्यावा अशी अपेक्षा लोढा यांनी व्यक्त केली.
