राज्यातील पेपरफुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवा !
राज्यातील पेपरफुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवा !
मुंबई, दि. २० डिसेंबर:
राज्यातील पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही. लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्या खर्या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यासंदर्भात म्हणाले की, टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेंकडे ८८ लाख रुपये सापडल्यानंतर आज आणखी २ कोटी रुपये रोख आणि सोने सापडले. म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणार्या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय याच तुकाराम सुपेंनी दिले. काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच 3 महिन्यात बाहेर काढले. आता या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुख यांच्याकडे पोलीस भरतीची ओळखपत्रे सापडली आहेत. म्हणजे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलीस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत. या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी असे फडणवीस म्हणाले.
