छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना हा राष्ट्राच्या अस्मितेवरचा हल्ला
छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना हा राष्ट्राच्या अस्मितेवरचा हल्ला..
कर्नाटक सरकारने दोषींना शोधून काढून कठोरात कठोर कारवाई करावी.
मुंबई, दि. 18 डिसेंबर :
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. कर्नाटकातील बंगळुरु शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा झालेला प्रकार हा देशवासियांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे. कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकारने या घटनेकडे गांभीर्यानं पहावं, दोषींना शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
अजित पवार पुढे म्हणाले की, पुतळा विटंबनेच्या या घटनेबद्दल महाराष्ट्रासह समस्त देशवासियांच्या भावना अत्यंत तीव्र असून मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता कर्नाटक सरकारने घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी अशा कुठल्याच घटनेनं जराही कमी होणार नाही, मात्र अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही.
