परमवीरसिंगांना वाचवण्याचा केंद्रीय यंत्रणांचा प्रयत्न
परमवीरसिंगांना वाचवण्याचा केंद्रीय यंत्रणांचा प्रयत्न.
मुंबई दि. १४ डिसेंबर:
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांचे महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे डील केंद्र सरकार व भाजपसोबत झाले होते. त्यातूनच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले. आता केंद्रीय यंत्रणा परमवीरसिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न करते आहेत मात्र एक दिवस एनआयएला खरे काय आहे हे सांगावे लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
नवाब मलिक पुढे म्हणाले की, परमवीरसिंग यांनी खोटे आरोप आणि राजकीय षडयंत्र करुन अनिल देशमुख यांना फसवले. आघाडी सरकार व अनिल देशमुख यांना बदनाम करण्याचा दुरुपयोग केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून झाला. या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने चांदीवाल आयोग नेमला असून या आयोगासमोर सचिन वाझे याने अनिल देशमुख यांना पैसे दिले नाहीत असा जवाब नोंदवला असल्याचे समोर येत आहे.
मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील जिलेटीन कांड प्रकरणी एनआयएने परमवीरसिंग यांचा जवाब नोंदविल्यानंतर ते फरार झाले होते. मात्र एनआयएने चार्जशीटमध्ये जो मास्टरमाईंड आहे तो कोण आहे हे सांगितले पाहिजे. एनआयएने अद्याप त्यावर चार्जशीट का दाखल केली नाही? परमवीरसिंग यांच्या घरात शर्मा आणि वाझे यांची बैठक का झाली? त्यांचे नाव घेतले जाते, ड्रायव्हरचा जवाब सांगितला जातो, इनोव्हा गाडीची चर्चा होते मात्र परमवीरसिंगच्या नावाची चर्चा होत नाही. एनआयए केंद्र सरकारच्या दबावाखाली परमवीरसिंग यांना वाचवत आहे हे सत्य आहे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
