एसटी कर्मचाऱ्यांना ४१ % पगारवाढ..कर्मचारी असमाधानी !
एसटी कर्मचाऱ्यांना ४१ % पगारवाढ..कर्मचारी असमाधानी !
एसटी कर्मचारी मात्र विलीनीकरणावर ठाम.
मुंबई, दि. २४ नोव्हेंबर :
एसटी कर्मचाऱ्यांना ४१ टक्के पगारवाढ व महिन्याच्या १० तारखेच्या आत पगार देण्याचा प्रस्ताव सरकारच्या वतीने परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी व त्यांचे नेतृत्व करणारे आ. सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थित ठवला आहे. विलीनीकरणाच्या मागणीवर समितीचा जो निर्णय येईल तो मान्य असेल असे स्पष्ट करत कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावे असे आवाहन केले.
यावेळी अनिल परब म्हणाले की,१ वर्ष ते १० वर्षांपर्यंत सेवा दिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ठोक ५ हजार रुपयांची वाढ केली जाईल आता ते १२ हजारावरून १७ हजार होणार. म्हणजेच एकूण पगारात ७ हजार २०० रुपयांची वाढ झाली आहे. १ वर्ष ते २० वर्षांपर्यंत सेवा दिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ठोक ४ हजार रुपयांची वाढ दिली जाईल. घरभाडे भत्ताही सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिला जातो. सरकारी कर्मचाऱ्यांना जो डीए दिला जातो तोच एसटीच्या कर्मचाऱ्यांना डीए दिला जातो. एसटीच्या इतिहासातील आतापर्यंतची ही सर्वात जास्त पगार वाढ असल्याचे परब म्हणाले.
विलिनीकरणाबाबतची त्रिसदस्यीय समिती आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार. उच्च न्यायालयाने विलिनीकरणाबाबत स्थापन केली समिती. या समितीचा जो निर्णय येईल तो आम्ही मान्य करू अशी आमची भूमिका पूर्वीच जाहीर केली होती. एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा व कर्मचाऱ्यांनी तत्काळ कामावर रुजू व्हावे. मुंबईत आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परवा कामावर हजर होण्याची मुभा देण्यात आली आहे कामावर हजर झाल्यास त्यांचे निलंबनही मागे घेणार.
नवीन कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरासरी 5000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या मूळ वेतनामध्ये 7,200 रुपये वाढ होतील. दहा वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 4000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या मूळ वेतनात 5,760 रुपये वाढ होतील. ज्या कर्मचाऱ्यांची 20 वर्षे सेवा पूर्ण झाली आहे त्यांच्या मूळ वेतनात सरासरी 2,500 रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या वेतनात 3,600 रुपयांची वाढ झाली आहे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 30 वर्षे किंवा त्याहून जास्त झाली आहे त्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 2,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना इतर भत्त्यासह 3,600 रुपयांची वाढ मिळणार आहे.
कर्मचारी मात्र या पगारवाढीवर समाधानी नाहीत. विलीनीकरण केल्यशिवाय संप मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
