उद्धव ठाकरे यांना कुणी मुख्यमंत्री मानायला तयार नाही
उद्धव ठाकरे यांना कुणी मुख्यमंत्री मानायला तयार नाही..
मुंबई, 17 नोव्हेंबर :
महाराष्ट्रावर आज विश्वासार्हतेचे मोठे संकट आहे.
सरकार कुठे आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे.
एक मुख्यमंत्री आहे, त्यांना कुणी मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि जनतेचे मात्र हाल होत आहेत. हे सरकार कायद्याचे राज्य नाही तर ‘काय दे‘ चे राज्य आहे, असा घणाघाती हल्लाबोल
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मविआ सरकारवर केले.
भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी बैठकीत संबोधित करताना फडणवीस म्हणाले की, राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी चालली आहे आणि शेतकऱ्यांकडे मात्र कुणी पाहायला तयार नाही.
राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे. राज्यात दहशतवाद्यांशी व्यावसायिक संबंध आणि अवैध रेती, अवैध दारू आणि सट्टा गावोगावी. महाराष्ट्राची अशी अवस्था कधीच झाली नव्हती. आमच्याकडे इनामी नाही आणि बेनामी नाही, त्यामुळे आम्ही कुणाला घाबरत नाही. अमरावतीत जे घडले ती कोणती घटना नाही तर एक प्रयोग आहे. सावध व्हा. त्रिपुरात काय झाले? बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविरोधात त्रिपुरात रॅली निघाली. फेक न्युज फॅक्टरीचे काम सुरू, त्रिपुरा पोलिसांनी कारस्थान उघड केले. नंतर राहुल गांधींचे ट्विट आणि मग प्रयोग सुरू होतो. हा हिंसाचार सरकार समर्थित आहे .अमरावतीत SRP च्या 7 तुकड्या होत्या. पण त्यांना कोणते आदेश दिले गेले नाही. आझाद मैदानात जे झाले तो सेम पॅटर्न आहे. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना अटक नाही. आमचे पोलिस काय मार खाण्यासाठी आहेत आहे का ? असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीस यांचा विचारला.
भाजपचा कार्यकर्ता कधीही दंगल करीत नाही. पण कुणी अंगावर आले तर सोडणार नाही. आम्ही सर्वसमावेशकतेचे राजकारण करतो, पण लांगूलचालन करीत नाही. लांगूलचालन करणाऱ्या शक्तींना वाटत असेल की आता आपले सरकार आहे, तर आपण काहीही करू. पण भाजपचा कार्यकर्ता असे होऊ देणार नाही.
एका मुलीवर ४०० लोक बलात्कार करतात, काय चालले आहे महाराष्ट्रात? सरकार म्हणते आम्ही शक्ती कायदा करू. पण सरकारमध्ये केवळ ‘भक्ती‘ उपक्रम चालू आहे. मराठवाडा, विदर्भाच्या सर्व योजना बंद आहेत. शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही. वैधानिक विकास मंडळ बंद, सिंचन, पाण्याच्या योजना बंद,
शेतकऱ्यांची वीज बंद, शाळा सुरू केल्या आणि लगेच शाळांच्या वीज कापल्या.
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर कर कमी केला, तर देशातील २५ राज्यांनी त्यात भर घातली. पण महाराष्ट्र मात्र काहीच करायला तयार नाही. हे म्हणतात उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. मंदिर बंद होते, पण दारू सुरू होती ना! त्यातून तुम्ही कमाई केलीच ना. छोटी-छोटी राज्य रडत नाही तर लढतात. महाराष्ट्रात मात्र रोज सकाळी नरेंद्र मोदींचे नाव घेऊन रडतात. बिल्डरांना सवलती देताना यांना GST आठवत नाही, गरिबांना, शेतकऱ्यांना पैसे द्यायचे म्हटले की, जे पैसे टप्प्याटप्प्याने मिळत आहेत आणि मिळत राहतील त्या GSTचे रडगाणे गातात.
महाविकास आघाडी सरकारने सर्वांसोबत विश्वासघात केला आहे. सामान्य माणसाची ताकद आता दाखविण्याची वेळ आली आहे. जनतेसाठी, त्यांच्या कल्याणासाठी लढायला मैदानात उतरण्याची वेळ आली आहे, असे फडणवीस म्हणाले.
