जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा भाजप दंगलीचे अस्त्र बाहेर काढते
जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा भाजप दंगलीचे अस्त्र बाहेर काढते.
मुंबई दि. 16 नोव्हेंबर :
जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा भाजप दंगलीचे अस्त्र बाहेर काढते. मात्र राज्यातील जनतेला दंगलीचे राजकारण कधीही आवडत नाही. अशा विनाशी राजकारणाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत निषेध केला.
अमरावती येथे नियोजन पद्धतीने शहरात दंगल भडकवली गेली. याची चौकशी पोलिस करत आहेत. मुंबईतून पैसे पाठविण्यात आले असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यात येऊन सांगतात की, महाराष्ट्राच्या सरकारला उखडून टाकू. मात्र सरकारे अशी उखडली किंवा बसवली जात नाहीत. केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून धमकावले जाते. बंगालमध्ये हे दिसले. नेत्यांना घाबरवून भाजपमध्ये घेतले गेले. मात्र जेव्हा तृणमूलचे सरकार आले तेव्हा त्याच नेत्यांनी पुन्हा आपल्या पक्षात प्रवेश केला. भाजपला हे समजायला हवे की, तुम्ही पैसे आणि केंद्रीय यंत्रणाच्या माध्यमातून सरकारे उखडू शकत नाही असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला.
महाराष्ट्राच्या सरकारचे चुंबक लक्ष्मी नाही असे भाजपला सांगतानाच छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा हे महाविकास आघाडी सरकारचे चुंबक आहे अशा शब्दात नवाब मलिक यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहे.
वसीम रिझवी यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे वाद निर्माण झाला होता. यामुळे काही ठिकाणी बंद पुकारला गेला. ज्याला हिंसक वळण लागले. काही ठिकाणी दगडफेकही झाली. अशा सर्व लोकांच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. मालेगावमध्ये निघालेल्या मोर्चामध्ये देखील अशीच अप्रिय घटना घडली. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक करण्यात आल्याची चर्चा झाली. मात्र त्यात तथ्य नाही. मुफ्ती ईस्माईल यांनी काही वर्षांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली तिथे काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यानंतर मुफ्ती ईस्माईल यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत निवडून आलेले सर्व नगरसेवक देखील गेले होते. त्यामुळे नगरसेवक हे कागदोपत्री राष्ट्रवादीचे असले तरी ते एमआयएममध्ये गेलेले आहेत असा खुलासाही नवाब मलिक यांनी केला.
