साखर कारखान्यांनी आता इथेनॉल, वीज व हायड्रोजन निर्मितीवर भर द्यावा

0
IMG-20211114-WA0112

साखर कारखान्यांनी आता इथेनॉल, वीज व हायड्रोजन निर्मितीवर भर द्यावा .

नाशिक, 15 नोव्हेंबर :
सहकारी कारखान्यांचा जन्म हा मुळात महाराष्ट्रात झाला. या कारखान्यांनी राज्यातील ऊस उत्पादकांना न्याय देण्याचे काम केले. पूर्वी साखर एक साखर एवढेच साखर कारखान्याचे चक्र होते आता ती परिस्थिती बदलली आहे. केवळ साखर नव्हे तर इथेनॉल, वीज आणि हायड्रोजन निर्मिती करण्याची गरज आहे. कारखान्यात जर या चार प्रकारची निर्मिती करण्यात आली तर नक्कीच साखर कारखाने यशस्वी होऊन शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल. राज्यातील काही कारखान्यांनी हा प्रयोग केला आहे. तो आपणही करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा शरद पवार यांनी केले.

रानवड येथे स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था पिंपळगाव बसवंत संचलित कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना लि. काकासाहेब नगर रानवड या कारखान्याचा ३९ वा गळीत हंगाम शुभारंभ माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

पवार पुढे म्हणाले की, कमीत कमी पाण्यात ऊस उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे. ऊस उत्पादक शेतकरी ऊस उत्पादन करण्यापेक्षा राजकारणात अधिक लक्ष घालतात. यामुळे शेतकरी अडचणीत येत असून शेतकऱ्यांनी आपले पीक चांगले कसे येईल यासाठी प्रयत्न करावे त्यातून चांगला मोबदला शेतकऱ्यांना मिळेल असे सांगत शेतकऱ्यांची साथ असेल तर रानवड कारखान्याला यश नक्कीच मिळेल यात कुठलीही शंका नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नाशिक जिल्ह्यात राज्याच्या कारखानदारीचे नेतृत्व पूर्वी होत होते. कर्मवीर काकासाहेब वाघ यांनी राज्यातील कारखानादारांचे नेतृत्व केले. कुठलीही गोष्ट ठरविली ती योग्य असेल तर त्यात तडजोड करायची नाही असे काकासाहेब वाघ यांचे नेतृत्व होते. त्यांनी सुरू केलेला कारखाना हा बंद झाला आणि आता हा बंद पडलेला कारखाना सुरू करण्याची हिंमत आमदार दिलीप बनकर यांनी दाखविली ही अतिशय महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, देशातील कारखाने आणि धरणे ही देशातील रत्न आहे असे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले आहे. त्यातील एक एक रत्न विकण्याचे काम सद्याच्या सरकारकडून विकण्यात येत आहे. ही दुर्दैवी बाब आहे. पद्मश्री काकासाहेब वाघ यांनी सुरू केलेला कारखाना आमदार दिलीप बनकर यांनी पुन्हा एकदा सुरू केले ही अतिशय आनंदाची बाब आहे. महाविकास आघाडी सरकार त्यांच्या पाठीशी आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक तसेच निफाड कारखाना सुरू करण्यास आपले प्रयत्न आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले पाहिजे त्यासाठी कारखाना यशस्वीपणे सुरू राहील यासाठी सर्वांगीण प्रयत्न करण्यात यावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले की, येणाऱ्या कालावधीत साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी, नागरिक, कामगार यांची यशस्वी घोडदौड सुरू राहील. महाविकास आघाडी सरकार हे शेतकरी हिताची जपवणूक करणारे असून शेतकरी कर्जमाफी तसेच अवकाळी बाबत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिलेली आहे. शेतकरी हिताचे हे सरकार येणाऱ्या काळात या कारखान्याचा विकासासाठी आपले योगदान देईल. कृषी विभागाच्या वतीने आवश्यक ती मदत करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *